सोलापूर : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरूणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृत तरूणाला दोघाजणांनी वेळीच पकडून पोलिसांच्या हवाली करून पीडित तरूणीचे प्राण वाचविले. तिचे प्राण वाचविणाऱ्या दोघा तरूणांसह पीडित तरूणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत देण्यात आली. परंतु बार्शी येथे गेल्या मार्चमध्ये एका अल्पवयीन मागास मुलीवर बलात्कार करून नंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून तिच्यावर दोघा नराधमांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. तिला मात्र शासनाकडून अद्यापि एक पैशाचीही मदत मिळाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित मुलीवर अजूनही वैद्यकीय उपचार सुरूच आहेत. मुख्यमंत्र्यांकडून एकास एक न्याय आणि दुसऱ्यास दुसरा न्याय असे करू नये, अशा शब्दात पीडित मुलीच्या आईने हाक दिली आहे. बार्शीत बारावी परीक्षा देणाऱ्या अल्पवयीन मागास तरूणीला दोघा नराधमांनी वाटेत अडवून तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी गंभीर दखल न घेतल्यामुळे मोकाट असलेल्या दोघा आरोपींनी पीडित मुलीच्या घरात येऊन, आमच्या विरूध्द पोलिसांत तक्रार देतेस काय, असा जाब विचारत तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले होते. यात तिच्या डोक्यावर आणि हातांवर गंभीर जखम झाली होती. डाव्या हाताची दोन बोटे तुटल्यामुळे ती कायमची अपंग झाली आहे.

या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असताना अखेर यात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस अधिका-यांसह इतर पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. याच दरम्यान, उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या पीडित मुलीची छबी ओळख होईल आशा पध्दतीने समाज माध्यमांवर प्रसारीत केली होती. त्यामुळे खासदार यांच्या विरोधात बार्शी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीवर सोलापुरात खासगी रूग्णालयात मोठा खर्च करून वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. त्यासाठी जवळ पैसा नसल्यामुळे नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून उधारीने पैसे घेऊन उपचार केले गेले. आजही पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरला जावे लागते. यात मोठ्या प्रमाणात होणारा खर्च पेलण्याची कुवत पीडित मुलीच्या कुटुंबीयांची नाही.

बार्शीच्या या निर्भया प्रकरणाची चर्चा होत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश नेत्या विद्या लोलगे यांच्या मार्फत पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून शासनाकडून पुरेशी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन हवेतच विरून गेले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका तरूणीला कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असता हल्लेखोराला दोघा तरूणांनी प्रसंगावधान राखून पकडले आणि तरूणीचे प्राण वाचविल्याच्या घटनेची राज्यभर चर्चा झाली. यातील दोघा बहाद्दर तरूणांसह पीडित तरूणीला मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे.

मात्र बार्शीतील बलात्कार झालेल्या आणि नंतर मस्तवाल बलात्कारी तरूणांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्यामुळे महिनाभर मृत्युच्या दारात राहिलेल्या पीडित अल्पवयीन मुलीला एका पैशाचीही मदत मिळाली नाही. फक्त आश्वासन मिळाले. त्याबद्दल पीडित मुलीच्या आईने तीव्र शब्दात खंत व्यक्त केली आहे. पीडित मुलीने भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु बलात्कारी नराधमांच्या हल्ल्यात हाताची बोटे तुटल्यामुळे तिला कायमचे अपंगत्व आले आहे. ती नोकरीसाठी अर्जही भरू शकत नाही, अशा अभागी पीडितेच्या  आईने प्रसार माध्यमांशी बोलताना  व्यथा मांडली. बार्शीत आम्हाला भीतीच्या छायेत राहावे लागत आहे. आरोपीच्या हस्तकांकडून अधुनमधून धमकावले जाते. त्यामुळे आपला कोणी वाली नाही. आपणास असाह्यतेची जाणीव होत राहते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.