आमदार गोपीचंद पडळकरांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर त्यांनी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी झालेल्या गोंधळावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
आमदार पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “नुकत्यात पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत आहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनास जाण्यापासून रोखलं.शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असलेल्या दाऊद इब्राहीमच्या बहिणीचे आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातावाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो.”
तसेच, “हिंदूराजमता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत होता, हिंदू संस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती. त्यावेळी आहिल्यादेवींनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, त्याचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमता आहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे अहमदनगर हे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे, अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे.” अशी मागणी गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याचबरोबर “त्यामुळे आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहेत? मुघलशाही की होळकरशाहीचा? अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन, आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा, हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय हे लक्षात ठेवा.”असंही पडळकरांनी म्हटलं आहे.