मुंबई विद्यापीठाच्या ठरलेल्या सिनेट निवडणुकांना स्थगिती दिल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज (१८ ऑगस्ट) दुपारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. आदित्य ठाकरे म्हणाले, “सव्वालाख मतदारांनी प्रत्येकी २० रुपये भरून नोंदणी केली. यानंतर तीन महिने त्यांची तपासणी होऊन यादी तयार झाली. तसेच हिंसाचार किंवा वादाची कोणतीही घटना घडलेली नसताना मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक रद्द केली आहे. या निवडणुका रद्द करण्यामागे राज्याचे घटनाबाह्य आणि डरपोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक नंबरचे डरपोक आहेत. ते डरोपक असल्यामुळेच त्यांनी भाजपात उडी घेतली. अजूनही ते घाबरत आहेत. निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक अद्याप झाली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप होऊ दिल्या नाहीत. यानंतर किमान मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका तरी होतील असं आम्हाला वाटलं होतं. परंतु, या निवडणुकीला सामोरं जायलाही ते घाबरत असतील, तर आपण समजायचं तरी काय? हे ही वाचा >> मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना…” दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या टीकेला शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय शिरसाट यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी आमदार शिरसाट म्हणाले, विद्यापीठातल्या निवडणुकीइतकीच आदित्य ठाकरेंची मर्यादा राहिली आहे. आदित्य ठाकरे यांनी आता सिनेट निवडणूक, कॉलेजमधला मॉनिटर किंवा सीआरसाठीच्या (Class Representative) निवडणुका लढवाव्यात. इतर निवडणुकांमध्ये त्यांना संधी मिळणार नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अशा वक्तव्यांना फारसं महत्त्व देऊ नका.