Raj Thackeray: विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ, आ. डॉ. किरण लहामटे, काशीराम पवार, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी आज मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून आंदोलन केले. या आंदोलनावर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांनी आज थेट मंत्रालयात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर उड्या घेतल्या. या आंदोलनानंतर एकच खळबळ उडाली. विधानसभा उपाध्यक्ष असलेल्या झिरवळ यांना अशापद्धतीने आंदोलन करावे लागले असल्यामुळे विरोदकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

राज ठाकरे यांनी मात्र या आंदोलनावर आपल्या तिखट शैलीत टीका केली आहे. “सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचा >> Narhari Zhirwal : VIDEO : पेसा भरतीच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजाच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षक जाळीवर मारल्या उड्या

“सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून ‘जनतेच्या सेवेला सत्ता हवी’, म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?”, असाही प्रश्न राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून विचारला आहे.

राज ठाकरे यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले, “सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.”

महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली

“महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे. त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालं आहे, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे, मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा. माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या. तुम्हाला गृहीत धरायचं, तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची, ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे”, अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी केली.

तेव्हा जागे व्हा…

“आणि “या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील. तेंव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा!”, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.