Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेते आपआपल्या पक्षसंघटनेचा आढावा घेत आहेत. या माध्यमातून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबईत पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
यावेळी राज ठाकरे यांनी पक्षाला बळकटी देण्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनेत काही महत्वाचे बदल देखील केले. मनसेच्या केंद्रीय समितीची स्थापना करत मुंबई आणि ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एक सूचक विधान केलं. “एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा भरलेली आहे”, असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“मला हे कळलं नाही, एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा भरलीय. आतमध्ये विधानसभेत सगळे खोकेभाईच भरलेत. मूळ विषय बाजूला राहतात आणि आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला भरकटवून टाकलं जात आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेची काही दिवसांपासून मोठी चर्चा सरु आहे. त्याचे पैसे उडवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. दरम्यान, याचाच संदर्भ देत राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महायुती सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला आता भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार यांनी काय प्रत्युत्तर दिलं?
“मला वाटतं की एखादं वाक्य आपलं आस्तित्व जाणून घेण्यासाठी केलं जातं आणि मग आपल्याकडे सर्वांचं लक्ष आकर्षित करून घेतलं जातं. हे महाराष्ट्रातील जनतेला कळलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत जे कामे करतात, मग ते कोणत्याही पक्षाचे असतील त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे. मात्र, ज्यांना निवडून येता येत नाही. ज्यांना लोक निवडून देत नाहीत ते विधानसभेत न जाता अशा प्रकारे ‘विधानं’ करण्याच्या कार्यक्रमात बसतात”, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.