मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि मराठा आरक्षणासंदर्भात जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या आधीचा होता. माईक सुरु असताना मुख्यमंत्री दोन वाक्यं बोलून गेले. त्यावर अजित पवार यांनी हो, येस असं म्हटलं आणि फडणवीस म्हणाले माईक सुरु आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. काँग्रेसने, ठाकरे गटाने या व्हिडीओवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रात या गद्दारांचं सरकार आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनीही केली. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपल्यानंतर जे ट्वीट केलंय त्यातल्या शेवटच्या दोन ओळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याच व्हिडीओवरून टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?

“गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.” पोटातलं ओठांवर आणताना सरकार विचार करेल हा टोला त्यांनी नेमका व्हायरल व्हिडीओवरूनच लगावला आहे.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका काय संवाद?

एकनाथ शिंदे – “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.”
अजित पवार – “हो……येस’

देवेंद्र फडणवीस – “माईक चालू आहे.”

मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात आलं. या सगळ्यावर राज ठाकरेंनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता राज ठाकरेंनीही यावरून टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करून एक आपलं म्हणणं मांडलं आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा निषेध केला आहे. मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.