नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा दिल्लीत रविवारी पार पडला. या सोहळ्यानंतर ७१ खासदारांना कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या सोहळ्याला राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी त्यांची एखादी प्रतिक्रिया समोर येईल असं वाटलं होतं, तसंच मोदींच्या शपथविधीची तारीख ठरली त्यांचा शपथविधी झाला तरीही राज ठाकरेंची काहीही प्रतिक्रिया आली नव्हती. यानंतर काही वेळापूर्वीच राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठिंबा

राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळावा घेतला त्यावेळी पंतप्रधान मोदींना आणि राज्यातल्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यांच्या या निर्णयाची उलटसुलट चर्चाही झाली होती. विरोधकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. त्यांना सुपारीबाज नेते वगैरे म्हटलं होतं. तर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. तसंच राज ठाकरेंनी नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. हे चारही जण निवडून आले आहेत. मुंबईत मोदींसह त्यांनी घेतलेली प्रचारसभा आणि त्यातलं त्यांचं भाषणही गाजलं होतं. यानंतरही राज ठाकरेंना शपथविधीला बोलवण्यात आलं नाही. ज्याबद्दल काही वेळापूर्वीच प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. ज्यानंतर काही वेळात राज ठाकरेंनी एक महत्त्वाची पोस्ट लिहिली आहे. जी चर्चेत आली आहे.

हे पण वाचा- Modi 3.0: राज ठाकरेंना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण नाही, प्रकाश महाजन म्हणाले,”गरज असेल तेव्हा उंबरे…”

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

माझ्या महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र

दरवर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, केक , मिठाई किंवा भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, केक , मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका.

आपली भेट हिच माझ्यासाठी भेट आहे !

सकाळी ८:००ते १२:०० ह्या वेळेतच मी उपस्थित असेन.

आपला नम्र

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तमाम महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी कळवा, कल्याण या ठिकाणी ज्या प्रचारसभा घेतल्या त्यात ते शिवसेनेचा वाघ आणि धनुष्यबाण असलेल्या मंचावरुन बोलले. हे दृश्यही लोकांनी डोळ्यांत साठवून घेतलं होतं. मात्र त्यांना शपथविधीसाठी बोलवलं गेलं नाही याची हळहळ मनसैनिकांच्या मनात आहे. “गरज असली की उंबरे झिजवायचे आणि नसली की दार लावून घ्यायचं, आज काल लोक मैत्रीवर विश्वास ठेवत नाहीत” असं म्हणत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ही खंत बोलूनही दाखवली. मात्र राज ठाकरेंनी याबाबत काहीही भाष्य केलेलं नाही. त्यांनी वाढदिवसाला कुणीही भेट आणू नये असं महत्त्वाचं आवाहन केलं आहे.