Amit Thackeray On Worli Assembly Constituency Election : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक नेते राज्यातील विविध मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षाच्या कामाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी करत आहेत. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही पक्षांकडून देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पक्ष संघटनेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. असे असतानाच आता राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीमधून अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घडामोडींवर आता अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सूचक विधान केलं आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता अमित ठाकरे म्हणाले, “पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार आहे”, अशी सूचक प्रतिक्रिया अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी दिली.

हेही वाचा : मालवण येथील कार्यक्रम नौदलाचा, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून साडेपाच कोटींचा खर्च का केला? – आमदार वैभव नाईक

अमित ठाकरे काय म्हणाले?

“मला वाटतं आमच्या पक्षाच्या बैठकीनंतर ही चर्चा झाली. वरळीसंदर्भातील हा विषय आमच्या पक्षाच्या बैठकीतील एक विषय होता. मात्र, तो विषय बाहेर कसा आला मला माहिती नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की, मी त्या बैठकीत एवढंच बोललो होतो की, पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार आहे. मी हेच लोकसभा निवडणुकीत देखील बोललो होतो. राज ठाकरे जो आदेश देतील तो आदेश मी पाळणार आहे”, असं मनसे नेते अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली असल्याची माहिती सांगितली जात आहे. या बैठकीत राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अनुषंगाने आढावा घेऊन काही महत्वाच्या सूचना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदावारी द्यायची? विधानसभेच्या किती जागा लढवायच्या, यासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, याआधी राज ठाकरे यांनी काही जणांच्या नावाची घोषणा केली होती. बाळा नांदगावकर शिवडी, दिलीप धोत्रे पंढरपूर, राजू उंबरकर वणी, सचिन भोयर राजुरा यांच्यासह आदी काही नावांचा समावेश आहे.