सांगली : यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या दीडपटीहून अधिक पाऊस नोंदला गेला असून यामुळे काढणीला आलेली खरीप पिके संकटात तर रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. तसेच थंडीचा हंगाम सुरू होऊनही पावसाचा मुक्काम कायम आहे.

जिल्हा पूर नियत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान ९३०.७ मिलीमीटर पाऊस पडला असून पावसाची सरासरी ५६५.९ मिलीमीटर इतकी आहे. सरासरीपेक्षा ६४.५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस पडत असून गेले दोन दिवस सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. मंगळवारी रात्रीही उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरू होता.

हेही वाचा >>> सांगलीत नायकवडींच्या निवडीने अजित पवारांचे दुहेरी ‘लक्ष्य’ ! मुस्लिम समाजास संधी देतानाच जयंत पाटील विरोधकांना बळ

जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस आणि कंसात सरासरी पुढील प्रमाणे मिरज ८४१.२ (४६०.४), जत ६१७.८ (४७१.९), खानापूर ७१६.(५१०.७), वाळवा ११८४.१ (५९५.७), तासगाव ८७७.९ (४९०.२), शिराळा १७१२.८ (९००.१), आटपाडी ५८५.६ (३३७.२) , कवठेमहांकाळ ८३६ (३७५.२), पलूस ८६४.७ (३०९.५) आणि कडेगाव ८४१.२ (५६८) मिलीमीटर. जिल्ह्यात पावसाचा मुक्काम अद्याप कायम असल्याने रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडली असून खरीप पिकांची काढणीही खोळंबली आहे. पीके काढणीला आल्याने शिराळा तालुक्यात भाताचे मोठे नुकसान होत आहे. तर पूर्व भागात द्राक्ष पिकाची फळछाटणीही अडचणीत आली आहे. पावसाचे प्रमाण कमी होताच छाटणी एकाचवेळी सुरू होणार असल्याने हंगामात एकाचवेळी फळ येण्याची शक्यता असल्याने दराबाबतही अनिश्चितता वाटत आहे. यातच सुरू असलेल्या पावसाने छाटणी झालेल्या भागातील कोवळे घड दावण्या, बुरशीला बळी पडत आहेत.