खासदार श्रीनिवास पाटील हे अधिवेशनासाठी दिल्लीला गेलेल असताना, त्यांचा मतदारसंघ असलेल्या साताऱ्यात मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला. पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. दरडी कोसळून माणसे गाडली गेली आहेत. शेती शिवार उभ्या पिकांसह वाहून गेली आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीत नाही तर मतदारसंघात असणं आवश्यक असल्याचं समजून खासदार श्रीनिवास पाटील हे सातारा जिल्ह्यात दाखल झाले. यानंतर त्यांनी वाई, देवरूखकरवाडी येथील परिस्थितीची पाहणी केली व तेथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांना धीर दिला. देवरूखकरवाडी येथील २० घरांवर दरड कोसळली त्यात सहा घरे पूर्ण गाडली गेली. २७ लोक अडकले होते. आमदार मकरंद पाटील यांनी सर्व प्रशासन आणि अनेक कार्यकर्ते घेऊन मदत कार्यात सहभागी होऊन तत्काळ बचावकार्य राबविल्याची माहिती मिळताच खासदार पाटील यांनी आमदार मकरंद पाटील यांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर येथील नुकसानीची पाहणी केली. या ठिकाणी अनेक घरात पाणी शिरले, रस्ते दहा दहा फूट खचले आहेत. महाबळेश्वर पोलादपूर पुरता वाहून गेला आहे घाट रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला आहे. आंबेघरमध्ये ११ तर ढोकावळे येथे चार मृतदेह आढळले - आंबेघर (ता. पाटण) येथे दरड कोसळून १५ लोकं दरडी खाली दबली गेली आहेत. मिरगाव येथे दहा ते अकरा लोक आणि ढोकावळे येथे चार ते पाच लोक ढिगाऱ्यात अडकली आहेत. मिरगाव सहा मृतदेह मिळाले चार लोकांचा शोध सुरु आहे.ढोकावळेत एनडीआरएफच्या मदतीने कार्यवाही पूर्ण झाली असून, तिथे चार मृतदेह आढळले आहेत. आंबेघर एनडीआरएफची मदतीची कार्यवाही सुरु असून, आतापर्यंत ११ मृतदेह मिळाले आहेत. जिल्ह्यात ओढ्यातून सहा लोक वाहून गेले आहेत. परिस्थितीची माहिती घेऊन खासदार पाटील हे आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत महाबळेश्वर येथे प्रशासकीय नियोजनाच्या मिटींगला हजर राहिले. त्यांनी, तिथे सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मेणवली, अभेपुरी, जांभळी येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीचा तेथील शेतकऱ्यांकडून आढावा घेत कोंढावळेकडे रवाना झाले. यानंतर भर पावसात चिखल तुडवत कोंढावळे ग्रामस्थांची भेट घेत प्रशासकीय अधिकारी, गावकरी, मदत देणारी लोक, संस्था यांना मार्गदर्शन करतात आणि तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो असे म्हणत त्यांनी आश्वासन दिले. तसेच, ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक अतिवृष्टीमुळे दगावले त्यांचे सांत्वन देखील केले. यानंतर आता खासदार श्रीनिवास पाटील सातारला दाखल झाले आणि जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न घेऊन उद्या दिल्लीला रवाना होत आहेत.