अलिबाग– सहा वेळला अनंत गिते लोकसभेवर निवडून गेले. चार वेळा मंत्री झाले. तीस वर्ष संसदेत होते. पण त्यांनी मतदारसंघासाठी काम केले नाही. जनतेचा विश्वासघात केला. अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मुरूड येथे केली. ते शेकाप नेते मनोज भगत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते.  पुर्वी नारूचा रुग्ण दाखवा आणि पैसे मिळवा अशी योजना होती. तसे  गितेंनी केलेले काम दाखवा आणि एक हजार घेऊन जा असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील तटकरे यांच्या व्देशापोटी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील नेते आज इंडीया आघाडीच्या नावाखाली एकत्र आले आहेत. पण व्देशावर राजकारण चालत नसते. ते विकासाच्या कामावर करायचे असते. ते मी करत राहीन.अनंत गीते म्हणतात मी जनतेचा विश्वासघात केला. पण गीते सर्वाधिक विश्वासघातकी आहेत. त्यांनी त्यांच्याच पक्षातील रामदास कदम, सुर्यकांत दळवी, भास्कर जाधव आणि भरत गोगावले यांचा विश्वासघात केला. त्यामुळे गीते यांना माझ्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही तटकरे म्हणाले.

हेही वाचा >>> खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सहा वर्षांनी सापडले; रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

आपल्या भाषणात तटकरे यांनी शेकाप नेत्यांवर स़डकून टिका केली. स्वताचे अपयश लपवायचे असेल तर दुसऱ्यावर आरोप करावे लागतात. शेकापचे नेते सध्या तेच करत आहेत.  २०१९ च्या माझ्या विजयात शेकाप आणि काँग्रेसचा हात होता, हे मी आजही जाहीरपणे कबूल करतो. पण महेंद्र दळवी यांच्या निवडणूकीत मी फुटक्या कवडीचीही मदत केली नाही. मी आघाडीचा धर्म पाळला. विधानसभा निवडणूकीत जेव्हा शेकाप नेत्यांना प्रचारासाठी येऊ का विचारले तेव्हा त्यांनी माझी गरज नसल्याचे सांगितले. मतदारसंघात राष्ट्रवादीचे मतदार नसल्याचे सांगितले गेले. पण विधानसभेतील पराभवाला मला जबाबदार धरले जात हे योग्य नसल्याचे तटकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा >>> वसंत मोरे म्हणतात “मी थोडासा वेळ घेतोय, पण माझी वेळ… “

शेकापने आपली भुमिका वेळोवी बदलली त्यामुळेच अजित कासार मनोज भगत सारखे नेते आमच्याकडे आले. ज्या जिल्ह्यातून सातत्याने शेकाप आणि काँग्रेसचे उमेदवार लोकसभेला निवडून जात होते. १९५२ सालापासून ज्या शेकापने जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवले, त्या जिल्ह्यात २००९ च्या निवडणूकीनंतर उमेदवार देता आला नाही. ही वेळ का आली. कोणाच्या नेतृत्वाखाली आली याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचा टोला तटकरे यांनी यावेळी लगावला.  मनोज भगत यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम उभा राहील अशी ग्वाही तटकरे यांनी यावेळी दिली.

यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ट नेते उपस्थित होते.

मुरुड तालुक्यात शेकापला खिंडार….  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापचे मुरूड तालुका चिटणीस मनोज भगत आणि अजित कासार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यातील शेकापच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. मनोज भगत हे गेल्या २१ वर्षांपासून पक्षाचे तालुका चिटणीस म्हणून कार्यरत होते. पक्षाच्या उभारणीत आणि संघटनात्मक त्यांनी महत्वाचे योगदान दिले होते. पक्षात चित्रलेखा पाटील यांच्या कॉर्पोरेट कल्चरला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे यावेळी भगत यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sunil tatkare slams anant geete for not doing public works during minister period zws