Supriya Sule on CBSE Board: केंद्र सरकारने एकाबाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तर दुसऱ्या बाजूला आता एसएससी बोर्डाला हद्दपार करून मराठी भाषेची गळचेपी सुरू केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणल्यानतंर आम्ही त्याचे स्वागत केले होते, पण याच्या माध्यमातून आमच्या मराठी शाळांना बंद पाडत आहात, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “एकाबाजूला देशात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बोर्डांना सरकार लाल गालीचा अंथरत आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडत आहे. याबाबत मी शिक्षण मत्री दादा भुसे यांना पत्र लिहून जाब विचारला आहे.”

माझे शिक्षण एसएससी बोर्डातूनच

“मी एक आई आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधीही आहे. मी स्वतः एसएससी बोर्डाच्या शाळेत शिकली आहे. पालकांकडे पर्याय असला पाहिजे, असे माझे मत आहे. पालकांना सीबीएसई, आयसीएसई, एसएससी असे कोणतेही बोर्ड निवडायची मुभा असली पाहिजे. एसएससी बोर्डाची काय चूक आहे?”, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.

सीबीएसई बोर्डासाठी सुविधा आहेत का?

“सरकार जर सीबीएसई बोर्ड आणणार असेल तर त्यासाठी त्यांची तयारी आहे का? तुमच्याकडे तो अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक आहेत का? मागच्या आठवड्यातच राज्यातील एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे. एका बाजूला शेतकरी, शिक्षक आत्महत्या करत आहेत आणि सरकारचे मात्र भलतेच काहीतरी सुरू आहे. जे आहे, त्यासाठी सरकारकडे खर्च करायला पैसे नाहीत, मग नवी टुम का काढली जात आहे?”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठी भाषेचे भवितव्य काय?

सीबीएसई बोर्डाच्या शाळेत मराठी भाषेचे काय होणार? राज्याचा इतिहास शिकविला जाणार की नाही? मराठी कविता, मराठी लेखकांचे धडे या बोर्डात असणार का? आज शाळांमध्ये वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा नाहीत. शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यात सीबीएसई मध्येच का आणले जात आहे?, असे काही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले.

Story img Loader