Supriya Sule लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेत आली आहे. कारण या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना १५०० तर काहींना तीन हजार रुपये मिळाले आहेत. मात्र सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय म्हणाले?

महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेतून तीन हजार रुपये देऊ. सोबतच यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले. तर, पुढील पाच वर्षांसाठी ही योजना निश्चित सुरू असेल, महिला भगिनींना ५ वर्षांचे ९० हजार रुपये मिळतील, असा शब्द अजित पवार यांनी पुण्यातल्या बालेवाडीतील कार्यक्रमातून दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) राखी पौर्णिमेच्या एक दिवस आधीच यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीने अशी घोषणा केल्याने ते आता म्हणालेत. मात्र ते फक्त सत्तेत परत येण्याची भाषा करीत आहेत. नेहमी मतांचीच भाषा महायुतीचे नेते करत आहेत. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे दुसरे तिसरे काहीही नाही. पंधराशे रुपयात महिलांची मतं विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने सुरू केला असल्याची टीका सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी महायुती सरकारवर केली आहे.

हे पण वाचा- कोणतीच बहीण लाडकी नसल्याचा अधिक अनुभव! सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवार लक्ष्य

राजेंद्र शिंगणेंबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचे केलेल्या कौतुकाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या की, शरद पवार यांचं कौतुक भाजपाचे लोकही करत असतात. सगळ्याच पक्षांचे लोक पवार साहेबांबद्दल अत्यंत आदराने बोलतात, हे आमचे भाग्य आहे. राजकारणात राजकारण होत असतं. मात्र वैयक्तिक संबंध देखील असतात. शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकांचे संबंध आहेत. राजेंद्र शिंगणे हे अत्यंत संवेदनशील नेते आहेत. मंत्री अनिल पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचे अडीच लाखांचे उत्पन्न असल्यास महायुतीचे सरकार त्यांनाही पंधराशे रुपये दर महिन्याला देतील, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात लोकशाही असून सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. असे म्हणत त्यांनी यावर फार बोलणं टाळले आहे.