MP Udayanraje Bhosale on Rahul Solapurkar: अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानावार चौफेर टीका झाल्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. यानंतर आता भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका व्यक्त केली असून राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात घणाघाती टीका केली आहे. “राहुल सोलापूरकरने अतिशय विकृत विधान केले असून त्याची जीभ हासडली पाहीजे, तसेच महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई करावी”, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल सोलापूरकर नेमके काय म्हणाले होते?

राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनलवरच्या पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना म्हणाले की, महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितले गेले. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही.”

उदयनराजे भोसलेंनी व्यक्त केला संताप

दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले म्हणाले, जगाच्या पाठीवर एकमेव असा महापुरुष होऊन गेला, ज्यांनी ३५० वर्षांपूर्वी एक विचार दिला. भारतच नाही तर अनेक देश त्यांच्या विचारांचे अनुसरण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही. देशातील विविध जाती-धर्माच्या लोकांना आपले कुटुंब समजले. शिवरायांच्या विचारांमुळेच आपली गुलामगिरीतून मुक्तता झाली. त्यांनी तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. असे असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ विधाने केली जातात. राहुल सोलापूरकरने महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे सर्वच शिवभक्तांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे.

तर देशाचे तुकडे होतील

“राहुल सोलापूरसारख्या व्यक्तीची जीभ हासडली गेली पाहीजे. महापुरुषांबाबत जे अवमानकारक विधाने करतात त्यांना जनतेने वेचून ठेचले पाहीजे. महापुरुषांबाबत बोलणाऱ्या विकृतांमध्ये वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो. जाती-धर्मात जी तेढ निर्माण होते, ती अशाच विकृतांमुळे होत असते. या अगोदरही आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली होती की, अशी विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा कायद्यानुसार कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत, तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही”, अशी भावनाही उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केली.

विकृत विधाने करणाऱ्या व्यक्तीचे चित्रपट किंवा ते जिथे जिथे अभिनय करत असतील, ते ते हाणून पाडले पाहीजे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही अशा लोकांना थारा दिला नाही पाहीजे. या लोकांना गाडले गेले नाही तर देशाच्या अखंडतेसमोर धोका निर्माण होईल. मी तर म्हणतो अशा विकृतांना सरळ गोळ्याच झाडल्या पाहिजेत, अशीही संतप्त प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली.