Maharashtra MSEB Employee Strike : अदानी वीज कंपनीला वीज वितरणाचा परवाना देऊ नये आणि वीज क्षेत्राचं खासगीकरण थांबवावं, या मागणीसाठी राज्यात वीज कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संप पुकारला. यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे (MSEB) संचालक आणि भाजपा समन्वयक विश्वास पाठक यांनी मोठं विधान केलं. “वीज क्षेत्रात क्रांती होऊन महावितरणसारखी कंपनी आपल्याला लागणारही नाही,” असं मत विश्वास पाठक यांनी व्यक्त केलं. ते बुधवारी (४ जानेवारी) एबीपी माझाशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वास पाठक म्हणाले, “उर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती होत आहे. प्रत्येक घर आपली घरासाठीची उर्जा कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न करत आहे. याचं उदाहरण म्हणजे सौरउर्जा आहे. हळूहळी ही क्रांती होऊन आपल्याला महावितरणसारखी कंपनी लागणारही नाही. ही वस्तुस्थिती आहे.”

“कामगार संघटनांनी काही गोष्टी सरकारलाही विचार करण्यासाठी ठेवाव्यात”

“दुरध्वनी क्षेत्रात खासगी कंपन्या येऊन क्रांती झाली. सध्या खासगी क्षेत्रात ४-५ खासगी कंपन्या आहेत. त्याचा फायदाच होत आहे. ग्राहकाचा विचार केला पाहिजे. महावितरणमध्ये सरकार, एमएसईआरसीसारखे नियंत्रणक, पैसे देणाऱ्या बँका, कर्मचारी आणि ग्राहक असे पाच भागधारक आहेत. कामगार संघटना या पाचही भागधारकांच्यावतीने बोलत आहेत. मात्र, त्यांनी काही गोष्टी सरकारलाही विचार करण्यासाठी ठेवाव्यात,” असं म्हणत विश्वास पाठक यांनी खोचक टोला लगावला.

आणखी वाचा – MSEB Employee Strike: खासगीकरण रद्द करा! पुण्यात संपकऱ्यांची घोषणाबाजी

“बावनकुळेंनी वीज कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी पगारवाढ दिली”

विश्वास पाठक पुढे म्हणाले, “कर्मचाऱ्यांच्या हिताबाबत काही प्रश्न असतील तर त्यावर सरकार नेहमीच कटिबद्ध आहे. कामगारांचा मागचा करार बघितला, तर चंद्रशेखर बावनकुळेंकडे हे खातं असताना त्यांनी सर्वात मोठी पगारवाढ दिलेली आहे. त्यामुळे कामगार महाराष्ट्रासाठी जसं काम करतात त्याचा मोबदलाही त्यांना दिला जातो आहे.”

“कामगार संघटना शाळा, विद्यार्थी, रुग्णालयांना वेठीस धरत आहे”

“कामगार संघटना सरकारने काय करावं आणि काय करू नये या भूमिकेत गेल्याने गोंधळ उडाला आहे. हा विषय संपाचा होतच नाही. कायद्यात परवाना द्यायचा की नाही त्याचा निर्णय एमईआरसीने घ्यायचा आहे. ते गुणवत्तेवर निर्णय घेतात. मात्र, कामगार संघटना अशाप्रकारचा संप करून शाळा, विद्यार्थी, रुग्णालयं यांना वेठीस धरत आहे.”

हेही वाचा : MSEB Employee Strike : संपामुळे राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती, एमएसईबी संचालक म्हणाले, “राज्यातील जनतेने…”

“असं असलं तरी हा वेठीस धरण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कारण महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यांनी तयारी केली आहे. वीज पुरवठा सुरळीत चालू आहे,” असा दावा पाठक यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mseb director vishwas pathak say no need of mseb in future pbs
Show comments