आपण घर बदललं की आपल्याला सगळ्या कागदपत्रांवरील पत्ता बदलून घेण्याचे एक मोठे काम असते. यामध्ये रेशनकार्ड, आधारकार्ड, मोबाईलबिल तसेच वीजबिल यांचा समावेश असतो. यातील विजबिलावरील पत्ता बदलणे आता सोपे होणार आहे. महावितरणने यासाठी पुढाकार घेतला असून नागरिकांचा त्रास वाचणार आहे. तुम्ही जर तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर केला असेल तर तुम्हाला हा पत्ता बदलणे सोपे होणार आहे.

वीजबिलावरील ग्राहकाच्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्या वतीने मोबाईलवर ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे. मागील दोन दिवसात राज्यातील सुमारे ५२ हजार ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून इतरांनीही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. मात्र यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक नोंद होण्याची आवश्यकता आहे. या एसएमएसवरील लिंक ओपन केल्यास त्यावर ग्राहकाचा पत्ता उपलब्ध होईल. त्या पत्त्यात दुरुस्ती करण्याची सुविधा सदर लिंकद्वारे ग्राहकांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार सोसावा लागणार नाही.

वीजबिलावरील पत्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे ग्राहकांना वेळेत बिल मिळणे, योग्य वेळेत रिडिंग करणे या प्रक्रियेत अधिक अचूकता येणार आहे. याचा ग्राहकांना चांगल्या पद्धतीने फायदा होणार असून वीजबिल भरुन महावितरणच्या सवलतीचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे. राज्यात महावितरणचे सुमारे २ कोटी ५० लाखापेक्षा अधिक ग्राहक आहेत. त्यापैकी जवळपास १ २ कोटी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईलची नोंदणी महावितरणकडे केली आहे. मोबाईलवरील एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी असेही आवाहन महावितरणने केले आहे.