लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. मात्र, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे महायुतील मोठा धक्का बसला. मात्र, यानंतर याचे विश्लेषण करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीकडून पदाधिकारी आणि आमदारांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या यावर विचारमंथन करण्यात आलं.

यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “शरद पवार यांनाही त्यांच्या ४ पेक्षा जास्त जागा निवडून येतील असं वाटलं नव्हतं. लोकसभा निवडणुकीचा निकाला हा अनपेक्षितपणे लागला. त्यांचे अनपेक्षितपणे जास्त खासदार निवडून आले. महाराष्ट्रात चुकीचा प्रचार केल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी निवडून आल्या. त्यामुळे आपल्यासाठी हा निकाल आनंद देणारा नाही”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

हेही वाचा : “आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!

आशिष शेलार काय म्हणाले?

“खोटं बोलणं, खोटं पसरवणं, ज्या गोष्टीचा काही संबंध नाही, त्या गोष्टी वारंवार पसरवणं हे प्रकार घडले. शरद पवार देखील म्हणत होते की, आमच्या चार जागादेखील येणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये लोकसभेचा निकाल लागला. मात्र, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हा निकाल नक्कीच आपल्याला सुखावणारा नाही तर दुखावणारा आणि जखम देणारा आहे. आपल्याला अडचण निर्माण करणारा निकाल आहे”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. यावळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्यात महायुतीला आलेल्या अपयशाबद्दलचं विश्लेषण केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीत आपण फक्त तीन पक्षांशी नाही, तर ४ पक्षांशी लढत होतो. तो ४ चौथा पक्ष म्हणजे खोटा प्रचार होता. हा खोटा प्रचार आपल्या लक्षात आला नाही. त्यामुळे आपण त्याला रोखू शकलो नाही किंबहूना आपण त्याला रोखण्यासाठी तयारी करू शकलो नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती असती तर मुंबई, कोकणात दिसायला हवी होती. ठाण्यापासून कोकणापर्यंत ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही. मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार मराठी माणसांच्या मतांवर निवडून आले नाहीत. मराठी माणसांनी मत दिलं असतं तर दक्षिण मुंबईत वरळीत जिथं आदित्य ठाकरे आमदार आहेत केवळ ६ हजार मते अधिक मिळाली नसती”, असंही फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावरही केलं भाष्य केलं. “मी ज्यावेळी राजीनामा देण्याचा विचार केला तेव्हा माझ्या डोक्यात काही रणनीती होती, आजही आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी काल अमित शाह यांना भेटलो. त्यांचीही भूमिका तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती. ते मला म्हणाले की, थोडे दिवस जाऊद्या. त्यानंतर आपण महाराष्ट्राबाबतची ब्ल्यू प्रिंट ठरवू”, असं फडणवीस म्हणाले.