रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या बावनदी बस थांब्या जवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून मुंबईच्या दिशेने मालवाहतूक ट्रक (एमएच ०८ एचडी ८२९२) जात होता. हा ट्रक बावनदी पुलाजवळ आला असता चालक मोहम्मद अफ्तार समशेर अली (वय २२) रा. नागनाथपूर जिल्हा सुलतानपूर, याचे ट्रकच्या वेगावरील नियंत्रण सुटले. हा ट्रक महामार्गावर एका बाजूला खोदून ठेवलेल्या भागात कोसळला.
अपघातातील ट्रक हा लोखंडी वजनदार पाईपने भरलेला असल्याने ट्रकमधील सर्व लोखंडी पाईप ट्रकच्या केबिनमधून बाहेर पडले. यामुळे केबिनमध्ये असलेल्या चालकासह त्याचा सहकारी महंमद गुलाम रजब अली (वय २१) राहणार इब्राहिमपूर, जिल्हा प्रतापगड, याच्या अंगावर पाईप पडल्याने या अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच केबिनचा चक्काचूर झाला.
बावनदी थांब्या जवळ एका महिन्यात सलग दोन वेळा अपघात झाल्याने ठेकेदार ईगल कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामावर नागरिक संताप व्यक्त केला. या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक केंद्रचे हेड कॉन्स्टेबल नाटेकर यांच्यासह इतर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून दोन तरुणांचा मृतदेह रत्नागिरी जिल्हारुग्णाल्यात पाठविण्यात आले. अपघातप्रकरणी प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.