Maharashtra News Updates : राज्यातील विविध भागात गुरुवारी पावसाने थैमान घातलं होतं. पण आता काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरण काय आहे. परिस्थिती हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईत पावसाची स्थिती सामान्य झाला आहे. शाळा महाविद्यालये सुरु राहणार असल्याची माहिती आहे. तसेच पुण्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. येथील रस्तेवाहतूक पूर्वपदावर येत आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. एकीकडे राज्यात पाऊसाचा कहर सुरू असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला २०० ते २२५ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Rain Update Today : मुंबईत पावसाचा जोर कमी; शाळा, महाविद्यालये सुरु राहणार
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर भागात गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत उल्हास नदीचा खाडी किनाऱ्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील खारफुटी नष्ट करून उभारलेल्या सुमारे पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी गुरुवारपासून महापुराच्या पाण्याच्या विळख्यात आहेत.
गुरुवारी दुपारी अलीबागच्या समुद्र किनाऱ्यावर जेडब्लूएस कंपनीचे जहाज भरकटलं होतं. या जहाजात १४ खलाशी असल्याची माहिती होती. दरम्यान, या खलाशांना आता भारतीय तटरक्षक दलाने वाचवलं आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं.
कल्याण : इतिहासकालीन, चित्रपट अभिनय क्षेत्रातील जुन्या व्यक्तिंच्या छायाचित्रांची तोडमोड करून त्या जागी राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सामायिक करून फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमा विरुध्द आंबिवलीमधील एका तरूणाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
देवेंद्र फडणवीसांविरोधात राज्यात षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच आम्ही दिलेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टीकलं असून ते सर्वोच्च न्यायालयातही टीकेल, असेही ते म्हणाले.
कल्याण : कल्याणमधील एका २१ वर्षाच्या केश सजावटकार (हेअर ड्रेसर) महिलेला तिच्या जुन्या मित्राने आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे, असे सांगून तिला कल्याण पूर्वेतील एका लॉजवर नेले. तेथे तिच्या मनाविरूध्द लैंगिक अत्याचार केले.
पिंपरी : पाण्याची गढूळता वाढल्याने पिंपरी-चिंचवड शहरात २६ जुलै २०२४ रोजी दिवसभरात होणारा पाणीपुरवठा नेहमीपेक्षा उशिरा, कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
कराड : पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना धरणक्षेत्रातील पावसाचा जोर आज शुक्रवारी सकाळी मावळला. कोयना पाणलोटात मुसळधार ओसरल्याने धरणाच्या सांडव्यावरुन दुपारी १२ वाजता प्रतिसेकंद १० हजार घनफूटाने वाढवण्यात येणारा जलविसर्ग रद्द करण्यात आला आहे.
खोट्या नरेटीव्हला बळी पडायला आम्ही भाजपा नाही, संजय राऊतांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्यापूर्वी आधी स्वत:च्या हृदयात झाकून बघावं, सत्ता मिळवण्यासाठी आपण काय घाणेरड्या खेळी केल्या, हे त्यांनी आठवून बघावं, असेही संदीप देशपांडे म्हणाले. तसेच २०१९ पूर्वी ज्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसून तुम्ही निवडणूक लढवली, तेव्हा ते महाराष्ट्राचे मित्र होते की शत्रू? वरळीत केमच्छो वरळीचे पोस्ट लावताना तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही का? असा प्रश्नही त्यांनी संजय राऊतांना विचारला.
मुंबई : अकरावी प्रवेशाची ‘पहिली विशेष प्रवेश यादी’ सोमवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेणे टाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे. सुरुवातीच्या तिन्ही नियमित फेऱ्यांमध्ये प्रतिबंधित झालेले सर्व विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच, विशेष फेरीपासून पुढे कोणत्याही विद्यार्थ्यास प्रतिबंधित केले जाणार नाही.
गडचिरोली : पहिल्याच पावसात जिल्ह्यातील एक हजार कोटींपेक्षा अधिक किंमतीचे ६ राष्ट्रीय महामार्ग आणि ५० हून अधिक राज्य व अंतर्गत मार्ग विविध ठिकाणी उखडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कायम चर्चेत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. यादरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पुण्यातील परिस्थितीबाबत लवकर संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन नागरिकांना कशाप्रकारे तत्काळ मदत दिली जाईल, यासाठी नियाजोन करू असं ते म्हणाले.
पुणे : विकासाच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी केलेले सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, त्यावर केलेली अतिक्रमणे यामुळे शहरावर पूरस्थिती ओढवली. तसेच, पावसाळी वाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची कामे पूर्ण केल्याचा महापालिकेचा दावाही खोटा ठरल्याचे उघड झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत असं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
बदलापूर : गुरूवारी रौद्र रूप धारण करणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळीत शुक्रवारी घट दिसून आली. उल्हास नदीची पाणी पातळी सकाळी १४.७० मीटर इतकी होती. त्यामुळे बदलापूर शहरावरचे पूर संकट टळले आहे. गुरुवारी उल्हास नदी आहे १८.८० मीटर इतकी सर्वोच्च पाणी पातळी गाठली होती.
#कासारसाई धरणाच्या सांडव्यातून नालापात्रात विसर्ग कमी करून १२० क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाचा अंदाज आणि धरणातील येवा लक्षात घेता विसर्ग कमी किंवा अधिक करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-सहाय्यक अभियंता-श्रेणी १, खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक २, पुणे
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 26, 2024
नागपूर : शहरात गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून गुन्हेगारी वाढत आहेत. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी नियुक्त असायला हवे. परंतु, शहरातील ३४ पैकी तब्बल २१ पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण कसे मिळवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे : यंत्रणा सक्षम नसल्या आणि असलेल्या मोडीत काढलेल्या असल्या, की शहरवासीयांची आबाळ होऊन अख्ख्या शहराची कशी वाट लागते, हे शहराने गुरुवारी अनुभवले. पावसाच्या या थैमानात सात जणांचा बळी गेला. पाऊस जोरातच पडला, पण हवामान विभागाचे अगम्य इशारे, धरणातून पाणी सोडण्याबाबत समन्वयाचा अभाव यांत भरडला गेला, तो सामान्य पुणेकर.
अलिबाग : गुरुवारी अलिबाग समुद्रात जे एस डब्ल्यु कंपनीचे बार्ज भरकटले. हे जहाज धरमतर कडून जयगडच्या दिशेने निघाले होते. या बार्ज वरील सर्व खलाशी सुखरूप आहेत. अडकलेल्या खलाशांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत बाहेर काढले जात आहे.
राज ठाकरे नुकताच परदेशातून आले आहेत. ते बराच काळ तिकडे होते त्यामुळे राज्यात काय सुरू आहे, हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे शत्रू अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता फक्त एका महिन्यात त्याची भूमिका बदलते. हे आश्चर्यकारक आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
मुंबई : सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील एमटीएनएल जंक्शन – एलबीएस मार्ग उन्नत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परिणामी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. याप्रकरणी कंत्राटदार जे. कुमारला ५० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जोपर्यंत खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात नाही, तोपर्यंत दिवसाला १० लाख रुपये दंडही ठोठावण्यात येणार आहे.
वर्धा : आर्थिक विकासाचा दूत म्हणून महामार्ग बांधणी होत असते. जलद व सुरक्षित वाहतूक साध्य झाल्यास प्रगतीचा आलेख उंचावतो, असे शासन सांगत असते. समृद्धी महामार्ग बांधतांना अशीच आकडेवारी सांगण्यात आली होती. मात्र, हा समृद्धीकडे की मृत्युंकडे नेणारा मार्ग, अशी टीका या मार्गावर घडलेल्या अनेक अपघातांमुळे सुरू झाल्याचे वास्तव आहे.
Anil Deshmukh: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असा आरोप करण्यास सांगितलं होतं. मी तो आरोप केला नाही असं अनिल देशमुख म्हणाले. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना अनिल देशमुख यांनी खुलं आव्हान दिलं आहे. फडणवीसांकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात असं अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) म्हणाले.
Jayant Patil Criticize Raj Thackeray : पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजना कशा पाहिजेत? अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (२५ जुलै) केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे टोला मारला. त्यावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
लवकरच पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु होतील. नागरिकांना योग्य ती मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे.
आज राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धुळे, नंदुरबार त्याचबरोबर अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. परिस्थितीही हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांच्या घरात चिखल झाला आहे. हा गाळ काढण्याचं काम सध्या सुरू आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र / इंडियन एक्स्प्रेस)
गुरुवारी मुंबईत मुळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी आहे. तसेच शाळा, महाविद्यालये सुरु राहणार असल्याची माहिती आहे.