वाई : ज्यांना जनतेने आधीच पालिकेच्या राजकारणातून निवृत्त केले आहे त्यांनी सातारा विकास आघाडीने निवृत्ती घ्यावी असले चोंबडे सल्ले देऊ नयेत असे जोरदार प्रत्युत्तर खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीने निवृत्ती घ्यावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा उदयनराजेंनी पत्रकातून जोरदार प्रतिउत्तर दिले. त्यांनी म्हटले की, आमदारांनी चोंबडे सल्ले देण्याचा नवीन धंदा निश्चित सुरू करावा. ज्यांना जनतेने आधीच नगरपालिकेतून निवृत्त केले आहे, त्यांनी असले सल्ले देऊ नयेत. प्रशासकीय राजवट पालिकेत लागून एक वर्ष होत आहे.
नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकरिता सातारा विकास आघाडी काहीच करत नाही, अशी बोंब मारणारेच ज्यावेळी कास जलपूजन केले, त्यावेळी सातारा विकास आघाडीचा काय संबंध अशी गरळ ओकत होते . प्रशासकीय राजवटीमध्ये नागरिकांची कामे होत नाहीत असे त्यांचे अप्रत्यक्ष म्हणणे म्हणजे नथीतून तीर मारण्याचा प्रकार आहे. दोन्ही डगरीवर हात ठेवणारे आमदार सैरभैर झाले आहेत. कुरतडलेली दाढी आणि भुरकट मिशांवर ताव देण्यापेक्षा कोणाला आलिंगन देणे केव्हाही चांगले. यांच्यासारखे पोटात एक आणि ओठात एक असे आमचे तरी नाही, असा टोला उदयनराजेंनी लगावला. निष्ठा दाखवायला लागत नाही तर, ती आपोआप प्रदर्शित होते. आपण भाजपमध्ये असताना सुमारे अडीच वर्ष कोणाची टीमकी वाजवली हे जनतेला माहित आहे. आता तुमची निष्ठेची नाटके सुरू झाली आहेत. आम्ही भाजपमध्ये जाणार याची काणकुण लागताच यांनी भाजपला जवळ केले.
त्यामुळेच आम्ही भाजपात जाण्याचा निर्णय लांबवला. ते भाजपात गेले म्हणून नंतर आम्ही गेलो, हा अर्थ काढत असतील तर ते चुकीचे आहे. प्रसिद्ध दादांनी देखील भाजपबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे भाजपात गेले म्हणून सर्व घडले असे देखील आता बडबडतील त्यांच्या बडबडीला आमच्या लेखी आणि जनतेच्या लेखी काडी मात्र किंमत नाही. आम्ही हत्तीच्या चालीने चाललो आहोत त्यामुळे इतरांच्या भुंकण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. पेन्शनर सिटी चे स्मार्ट सिटीत रूपांतर करण्यासाठी सातारा विकास आघाडी वचनबद्ध आहे. नागरिकांची साथ कोणाला मिळेल हे येणारा काळच ठरवेल, असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे.