अलिबाग- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिकनपाडा गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका मुलाचा समावेश आहे. नेरळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मदन जैतु पाटील वय ३५, अनिशा मदन पाटील वय ३० आणि विनायक मदन पाटील वय १० अशी तिघांची नावे आहे. चिकनपाडा गावात घराच्या मागील भागात असलेल्या ओढ्यात तिघांचे मृतदेह रविवारी सकाळी आढळून आले. तिघांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे तिघांची हत्या करून त्यांचे मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या झालेली अनिशाही सात महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – Pavana River: पत्नीशी भांडून पतीनं नदीत मारली उडी; बचावकार्यात अग्निशमन दलाला आले अपयश, पण ८ तासानंतर…

हेही वाचा – Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!

पाटील कुटुंब गेल्या दहा ते १२ वर्षांपासून या परिसरात वास्तव्याला होते. आज पहाटे त्यांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे. ऐन गणेशोत्सवाच्या धामधूमीत ही घटना घडल्याने चिकनपाडा गावावर दुखाचे सावट आहे.