लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे. भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिमंडळातही स्थान मिळालं आहे. ज्यानंतर सुप्रिया सुळेंनी खोचक प्रतिक्रिया दिली. पुण्याला मंत्रिपद मिळाल्याचा आनंद आहे. पण त्याचा फायदा कंत्राटदारांना न होता पुणेकरांना व्हावी ही अपेक्षा आहे. असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. त्यानंतर सुप्रिया सुळेंना तुमची मळमळ समजू शकतो म्हणत जोरदार उत्तर दिलं आहे.

Supriya Sule on Ajit Pawar: “दुसऱ्यांच्या घरात ढवळा ढवळ”; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

काय म्हटलं आहे मुरलीधर मोहोळ यांनी?

मा. सुप्रियाताई,
शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !
खरंतर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं. ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो. उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

“मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पुण्यात पाणी तुंबतं आहे. ससूनची बदनामी सुरु आहे. ड्रग्ज प्रकरण सुरु आहेत. पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करा. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रीपद मिळालंय, त्याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर आता मुरलीधर मोहोळ यांनी पोस्ट लिहित टोला लगावला आहे.

अजित पवार गटाला आणि भाजपाला टोला

“नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी शरद पवारांनाही निमंत्रण आलं होतं. मलाही फोन आला होता, मात्र आज संघटनात्मक बैठक होती आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी आणि शरद पवार उपस्थित राहणार नाही असं कळवलं होतं. अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही हे अपेक्षित होतं. मित्र पक्षांशी भाजपा कशी वागते हे मी दहा वर्षे जवळून पाहिलं आहे. मला दुसऱ्यांच्या घरात ढवळाढवळ करायला आवडत नाही. पण यात नवल वाटण्याचं काहीही कारण नाही.” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार आणि नरेंद्र मोदींना टोलाच लगावला आहे.