Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर ( Nana Patekar ) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि तेवढ्याच दिलखुलासपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नाना पाटेकर ( Nana Patekar ) यांना अनेक जण उद्धट किंवा रागीटही म्हणतात. मात्र कुठलीही पर्वा न करता नाना पाटेकर ( Nana Patekar ) त्यांची मतं मांडत असतात. नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमात नाना पाटेकर ( Nana Patekar ) बोलत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस आले. देवेंद्र फडणवीस आणि नाना पाटेकर यांची स्टेजवर गळाभेट झाली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एक वक्तव्य केलं आणि उपस्थितांना हशा पिकला. देवेंद्र फडणवीसही दिलखुलासपणे हसले.

काय म्हणाले नाना पाटेकर?

“आमची आता केंद्र सरकारकडे मागणी आहे की त्यांनी तातडीने स्वामिनाथन आयोग लागू करावा. एकनाथ शिंदे आज त्यांची प्रकृती नसल्याने आले नाहीत. तसंच अजित पवार यांनीही येण्याबाबत शब्द दिला आहे. मात्र त्यांचे अनेक कार्यक्रम ठरले आहेत. देवेंद्र फडणवीस येत आहेत. याचा आनंद आहे, हा नामचा कार्यक्रम आहे तो काही राजकीय कार्यक्रम नाही. आपण जे केलं ते सांगायचं कशाला? आपण करायचं आणि विसरुन जायचं. आता आमची एकच फक्त छोटी मागणी आहे की स्वामिनाथन आयोग लागू करा. तो लागू केला आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला तर सन्मानच होईल. अंशतः आयोग लागू केला आणि पण तो पूर्णपणे लागू करा एवढीच माझी विनंती आहे.” असं नाना पाटेकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आल्यावर काय घडलं?

नाना पाटेकर बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामच्या कार्यक्रमात आले. त्यावेळी लगेच नाना पाटेकर यांची गळाभेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि म्हणाले, “देवेंद्र फडणवीस जरा बारीक झाले आहेत ना? नाही मी मस्करी करत नाही. खरंच सांगतो आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही चांगलेच बारीक झाला आहात.” नाना पाटेकर ( Nana Patekar ) यांनी हे वाक्य उच्चारताच देवेंद्र फडणवीस दिलखुलासपणे हसले. त्यानंतर उपस्थितांमध्येही चांगलाच हशा पिकला.

हे पण वाचा- Nana Patekar on Politics: राजकारणात येण्याबाबत नाना पाटेकर यांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाना म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की तुम्ही बोला. पण तुम्हाला सांगू का? मला फडणवीस साहेब असं बोलताच येत नाही. मी देवेंद्र असंच म्हणतो. आपली १२ मिनिटांची क्लिप आहे ती पाहू त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलतील. साधारणपणे ते जेवल्याशिवाय जात नाहीत. जेवण केलं की मग नंतर ते जातील” असं नाना पाटेकर म्हणाले.नाम फाऊंडेशनच्या ९ वा वर्धापन सोहळा जागर नामचा या कार्यक्रमात ही गंमत घडली.

देवेंद्र फडणवीस नाना पाटेकरांबाबत काय म्हणाले?

“नाना पाटेकर यांना मी मोठा भाऊच मानतो. मला या चांगल्या कार्यक्रमात बोलवलंत त्याबद्दल मी आभारी आहे. यापुढेही मला बोलवत राहा. आम्हालाही नामचा कार्यकर्ता समजा. नाना आणि माझं नातं मोठ्या भावाप्रमाणे आहे. मी पूर्वीच्या काळी आवेशाने भाषण देत असे. माझं भाषण झालं की पाचव्या मिनिटाला नानांचा फोन यायचा, देवेंद्र चांगलं बोललास पण असा बोललास तर हार्ट अटॅक येईल. जरा शांतपणे बोल. असं करुन माझी भाषणाची स्टाईल बदलवणारे नाना पाटेकर आहेत. मी शांतपणा बोलताना दिसतो त्याला कारणीभूत नाना पाटेकर आहेत.” असं फडणवीस म्हणाले.