Nana Patole महाराष्ट्रात महायुतीला महाप्रचंड यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीच्या ४७ जागा येऊ शकल्या आहेत. दरम्या विरोधक हे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी महायुतीने ७६ लाख मतं मिळवली कशी काय? असा सवाल उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांनीही संख्या दाखवली पण त्यांना देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला आकडे दाखवत आमचे आमदार कमी कसे आणि सत्ताधारी आमदार कमी मतं मिळून जास्त कसे काय? हा प्रश्न विचारला. त्यावर त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी गणित मांडूनच उत्तर दिलं. आता नाना पटोले ( Nana Patole ) यांनी महायुतीचं सरकार कसं आलं हा लोकांनाही पडलेला प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

खरं तर एकट्या मारकडवाडीचाच विषय नाही. प्रत्येक गावात हा विषय निर्माण आहे. आलेलं सरकार हे जनतेच्या मनातलं आणि मतातलं नाही. हे सरकार कसं आलं याचाच लोकांना प्रश्न आहे. अनेक गावांमध्ये ग्रामसभांची प्रक्रिया सुरु झाली आहे. याची दखल मुख्यमंत्री कशी काय घेणार? निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे. दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होणं आणि अशा पद्धतीने असंतोष समोर येणं याची दखल न्यायालयाने घेतली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असं नाना पटोले ( Nana Patole ) यांनी म्हटलं आहे.

हे सरकार जनतेच्या मनातलं नाही-पटोले

मॉक पोलिंगचा दृष्टीकोन घेऊन सध्या लोक काम करत आहेत. जनतेच्या भावना अशा आहेत की हे सरकार जनतेच्या मनातलं नाही. आमची मतं चोरली गेली आहेत. रात्रीतून ७६ लाख मतं वाढली आहेत तिथेच हा सगळा खेळ दिसून आला. जनभावना मांडण्यासाठी हे सभागृह आहे. जनभावना मांडण्याचं काम आम्ही शनिवारी केलं. आमची लढाई विधानसभेतही लढू आणि रस्त्यावरही लढू. प्रतीकात्मक निषेध नोंदवत आम्ही शनिवारी आमदारकीची शपथ घेतली नव्हती. आज आम्ही सगळ्या आमदारांनी मात्र शपथ घेतली आहे. माझं मत हे माझा अधिकार आहे. मतदान केल्यानंतर आपला काही अधिकार उरतो की नाही? शेतकरी पुन्हा सीमेवर जमले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या हे सरकार मान्य करणार की नाही? सरकार जनभावनेचा आदर करणार की नाही? देशात बेरोजगारी वाढली आहे. नोकरी नसणाऱ्या तरुणांनीही मोर्चे काढले त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. एकदा मतदान केलं की तुमचा अधिकार नाही असंच सरकार वागतं आहे. असं नाना पटोले यांनी ( Nana Patole ) म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole serious allegation on mahayti and maharashtra assembly election results scj