महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली जात आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने पुण्यातील रांजणगाव येथे ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ उभारण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, पत्रकार परिषद घेत फडणवीसांना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. संबंधित सर्व प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेल्याचा दावाही त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्रातील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाबाबतही मोठं विधान केलं आहे. काही लोकांनी नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केल्याने हा प्रकल्प महाराष्ट्र आणि केरळ अशा दोन राज्यात विभागून होऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत. पण हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्रातच असावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही फडणवीस पुढे म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाणार प्रकल्पावरून टीकास्र सोडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गुंतवणुकीचा ‘बाप’ म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी… या प्रकल्पाला गुंतवणुकीचा ‘बाप’ यासाठी म्हणतो, कारण आजपर्यंत देशात एवढी मोठी गुंतवणूक कधीही आली नाही. यातील ७५ टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या कंपन्यांचा होता. या प्रकल्पात ३ लाख कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक होणार होती. तसेच १ लाख लोकांना थेट रोजगार आणि पाच लाखांपर्यंत इतर रोजगार निर्माण होणार होते. पण काही लोकांनी विरोध केल्यामुळे हा प्रकल्प आतापर्यंत होऊ शकला नाही. आता तो पूर्ण स्वरुपात होईल की नाही? हेही माहीत नाही. पण आम्ही प्रयत्न करत आहोत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा- ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’नंतर आता राज्यात लवकरच टेक्स्टाईल पार्क, नव्या वर्षात घोषणा होणार; फडणवीसांची माहिती

ही रिफायनरी कदाचित महाराष्ट्रासह केरळातील काही भागांत होऊ शकते, याबाबतची चर्चा सुरू आहे. अर्थात हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्रात व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे विरोधकांना माझा सवाल आहे की, तुम्ही ३ लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाला विरोध करत असाल तर महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? सरकारकडून आलेली ही गुंतवणूक तुम्ही परत पाठवली आहे. यामुळे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं आहे. तो रिफायनरी प्रकल्प आम्ही उभारणार आहोतच, पण तो नेमका कुठे असेल ते सांगू शकत नाही. यामध्ये काही गाव वगळली जातील आणि काही नवीन गावांचा समावेश केला जाईल, पण रिफायनरी महाराष्ट्रात होईल, असंही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanar refinery project will divide into maharashtra and kerala said devendra fadnavis rmm