नांदेड : १० फेब्रुवारी रोजी शहरात गुरुद्वारा परिसरातील घडलेल्या गोळीबार प्रकरणातल्या दोन मुख्य आरोपींना पंजाब पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विमानाने नांदेडात आणण्यात आले. हे दोघेही बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेशी संबंधित असून त्यांच्यासोबत आणखी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या ८ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड शहरातल्या गुरुद्वारा परिसरात १० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता एकाने केलेल्या गोळीबारात रवींद्रसिंघ दयालसिंघ राठोड (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला होता. तर गुरमीतसिंघ सेवालाल (वय ३२) हा गंभीर जखमी झाला. कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ ऊर्फ रिंधा याच्या भावाची २०१५ मध्ये हत्त्या झाली होती. या हत्त्येतील मुख्य आरोपी गुरमीतसिंघ सेवालाल याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. २२ जानेवारी रोजी गुरमीतसिंघ पॅरोल रजेवर सुटल्यानंतर हत्त्येचा बदला म्हणून रिंधाच्या सांगण्यावरून त्याच्यावर गोळीबार झाला होता. गुरमितसिंघ व त्याचा नातेवाईक रवींद्रसिंघ हे दोघे थांबलेले असतांना सकाळी झालेल्या या गोळीबारात रवींद्रसिंघ याचा मृत्यू झाला तर गुरमितसिंग बचावला. या प्रकरणी नांदेडमधील वजिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली व या प्रकरणात आरोपींना मदत करणारा मनप्रितसिंघ ढिल्लो (वय ३१) व हरप्रितसिंघ कारपेंटर (वय ३५) या दोघांना अटक केली होती. घटनेच्या दोन दिवसांनंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) देण्यात आला. आता एटीएसने पंजाबमधून दलजीतसिंघ करमसिंघ संधू (वय ४८), हरजीतसिंघ गील (वय ३२) व अर्शददीपसिंघ (वय २५) या तिघांना ताब्यात घेतले. हे पाचही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. परंतु मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता.

२४ फेब्रुवारी रोजी एटीएसने पंजाब पोलिसांच्या मदतीने गोळीबार करणारा जगदीश ऊर्फ जग्गा (रा. तरणतारण) याच्यासह त्याला मदत करणा-या शुभदीपसिंघ ऊर्फ शुभ या दोघांना अटक केली होती. पंजाब पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर शुक्रवारी नांदेड एटीएसने या दोघांना ताब्यात घेतले. शिवाय त्यांचा एक साथीदार पलवीरसिंघ बाजवा याला पंजाबमधून अटक केली. आरोपींना पंजाबहून विमानाने हैदराबाद येथे आणण्यात आले. आज पहाटे मोटारीने हे आरोपी नांदेडात आणल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. वैद्यकीय तपासणी व अन्य कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नांदेड एटीएसचे तीन पथकं पंजाबमध्ये तळ ठोकून होते. एटीएसचे नांदेडचे प्रमुख माणिक बेद्रे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. या प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास सुरू असून आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नांदेडसह छत्रपती संभाजीनगर, अकोला, नागपूर व पुणे येथील एटीसचे अधिकारी प्रयत्नरत होते. शिवाय नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचेही विशेष लक्ष होते.

नांदेडात गेल्या अनेक दिवसांपासून हरविंदरसिंघ ऊर्फ रिंधा याची दहशत आहे. व्यापारी, डॉक्टर व अन्य व्यावसायिक यांना खंडणीसाठी त्यांच्या टोळीने सळो की पळो करून सोडले होते. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्त्येनंतर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. परंतु, मुख्य आरोपी रिंधा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.