शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ट्वीटद्वारे बाळासाहेबांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना भेटू शकलो नाही, याची खंत असल्याचेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – बाळासाहेबांच्या शेवटच्या भेटीची आठवण सांगणारा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंची आदरांजली

नारायण राणेंनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता. त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणाऱ्या भावनांना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला. सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यावर कधीच परिणाम झाला नाही. ते नेहमीच आपली बोलण्या-वागण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखर तेच एकमेव होते. आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती. असं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी आहे, हे सांगताना मलाही अभिमान वाटत असे. साहेब, आपल्या शेवटच्या दिवसांत मला आपल्याला भेटता आलं नाही, याची मला आयुष्यभर खंत राहणार आहे, असं नारायण राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“बाळासाहेबांनी शेवटपर्यंत माणूसपण जपलं”

बाळासाहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. आपलं माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं. आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं आणि परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजाच्या घटकातून मित्र आणि अनुयायी लाभले. १९६६ मध्ये मराठी माणसाची एकमेव आशा म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कडव्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच मराठी माणूस आणि माझ्यासारखे तरूण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते. पक्ष चालवताना आपल्या पक्षाच्या माणसांवर ते प्रेमाचा जो वर्षाव करत आणि जो विश्‍वास दाखवत, त्यामुळे ती माणसं त्यांच्यासाठी जिवावर उदार व्हायलाही मागेपुढे पहात नसत. त्यांनी आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेतली. दुःखाच्या प्रसंगी विचारपूस करायला ते कधीही विसरले नाहीत. अशा वागणुकीमुळेच ते आपल्या पक्षाचेच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “आज महाराष्ट्रात खूप मोठी क्रांतिकारक घोषणा होईल, लोक त्याला…” संजय राऊतांचं सूचक विधान!

“मी आज आहे, तो केवळ बाळासाहेबांमुळे”

मला स्वतःला साहेबांचं खूप प्रेम मिळालं. त्यांनी माझ्यावर खूप विश्‍वास ठेवला होता. मी आज जो आहे, तो त्यांच्यामुळे आहे, हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेता असा माझा जो अविश्वसनीय प्रवास झाला आहे, तो केवळ साहेबांच्यामुळेच शक्‍य झाला आहे. त्यांनी आपला भक्‍कम पाठिंबा दिला. म्हणूनच मी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या नऊ महिन्यांच्या कारकीर्दीत लक्षात राहील, असं काम करू शकतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

“…पण आठवणी संपणार नाहीत”

पुढे ते म्हणाले, साहेबांचं धैर्य जेवढं जबरदस्त होतं तेवढंच माणसं ओळखण्याचं कौशल्यदेखील कौतुकास्पद होतं. त्याच्याही पलिकडे जाऊन ते जगातल्या अव्वल दर्जाच्या प्रतिभावंत व्यंगचित्रकारांपैकी एक होते. लेखक आणि संपादक म्हणून ते किती उच्च दर्जाचे होते, ते त्यांनी आपल्या ‘सामना’ आणि ‘मार्मिक’ या प्रकाशनांमधून दाखवून दिलं. आपल्या जबर इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी शिवसेनेला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं. त्यांनी कधीही धर्माबाबत किंवा राष्ट्रीय हिताबाबत तडजोड केली नाही. घायाळ करणारं वक्तृत्व आणि रोखठोक स्वभाव असूनही त्यांना सगळ्या क्षेत्रात मित्र लाभले. ३९ वर्षे मला लाभलेल्या त्यांच्या सहवासातल्या आठवणी आणि त्यांनी मला दिलेलं प्रेम याबद्दल लिहिता लिहिता कागद संपून जाईल, पण आठवणी संपणार नाहीत.

“पक्षातून बाहेर पडणं माझा नाईलाज”

आपल्या शेवटच्या दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटलं ते याही वेळेस मृत्यूला चकवून बरे होतील. पण ते आपल्यातून निघून गेले. मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांमुळं मला तो निर्णय घेणं भाग पडलं. आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “…तिथेच या हरा**** राजकीय चिता पेटेल अन् हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली”; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

“साहेब, मला क्षमा करा!”

साहेब, तुम्ही माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम मला दिलं. सेना सोडून बाहेर पडल्यावरदेखील तुम्ही मला दोनदा फोन केले. तुमच्या हृदयाच्या मोठेपणाचा आणखी कोणता पुरावा द्यावा? त्यांची प्रकृती बरी नसताना मला त्यांना भेटायचं होतं. मात्र, भेट घेता येत नसल्याने मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यांना शेवटचं पाहाण्याची संधी मला मिळू शकली नाही आणि ते आपल्यातून निघून गेले. साहेब! मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane wrote letter on balasaheb thackeray birth anniversary spb