अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली. “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत,” अशी टीका राणांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आम्ही फॉलोव करतो, असंही म्हटलं. त्या शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) अमरावतीत एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

नवनीत राणा म्हणाल्या, “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत. शरद पवार असो की आमचे इतर मोठे नेते ज्यांना आम्ही फॉलोव करतो त्यांना महाराष्ट्राच्या जनतेवर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्र सोडून बाहेरची मदत घेण्याची गरज पडत नाही.”

“अशा पप्पू लोकांनाच महाराष्ट्रावर विश्वास नाही”

“अशा पप्पू लोकांनाच महाराष्ट्रावर विश्वास नाही. महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास नाही म्हणूनच दुसऱ्या राज्यात जाऊन इतरांसमोर हात पसरत आहेत. त्यांनी इथं महाराष्ट्रात काम केलं असतं आणि गरीब जनतेमध्ये राहिले असते, त्यांच्या प्रश्नांवर काम केलं असतं तर महाराष्ट्राचं खूप चांगलं झालं असतं,” असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

“राज्यपालांना हटवण्यासाठी पंतप्रधान-राष्ट्रपतींकडे जावं लागेल”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी केलीय. तसेच दोन दिवसात कोश्यारींना न हटवल्यास महाराष्ट्र बंदची हाक दिली. यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “भगतसिंह कोश्यारी तसं जाणीवपूर्वक बोलले की अचानक विचार न करता बोलले हे माहिती नाही. मात्र, आम्ही स्वतः त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यांना हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे जावं लागेल.”

हेही वाचा : बिहार दौऱ्याचा अजेंडा काय आहे? आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून…”

“उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत”

“शिवाजी महाराजांवर असं कोणीही बोलू नये. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने तर अजिबात बोलू नये. मात्र, यांना पदावरून हटवा, नाही तर पूर्ण महाराष्ट्र बंद करू असं म्हणून उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. महाराष्ट्र बंद करणं म्हणजे खूप लोकांना अडचणीत आणणं आहे. या पदावर राजकारण करू नये,” असंही मत राणांनी व्यक्त केलं.

Story img Loader