लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी एका मशिदीसमोरून जात असताना प्रतिकात्मक पद्धतीने धनुष्यबाण चालवण्याची कृती केली होती. त्यांच्या या कृतीची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर लोकसभेत नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांनीही अशाच प्रकारे धनुष्यबाण चालवत नवनीत राणा यांना एकप्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केला केला होता. दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या कृतीबाबत आता नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

नवनीत राणा या आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना यशोमती ठाकूर यांच्या कृतीबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “मी जी कृती करते ती ओरिजनल असते, खरं तर ब्रॅंडला कॉपी करणारे अनेक जणं असतात. पण ब्रॅंड हा ब्रॅंडच असतो”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

हेही वाचा – VIDEO : लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच माध्यमांसमोर; म्हणाल्या, “अमरावतीकरांनी…”

निडणुकीच्या निकालाबाबतही केलं भाष्य

पुढे बोलताना त्यांनी निडणुकीच्या निकालाबाबतही भाष्य केलं. “अमरावतीच्या जनतेने जो निर्णय घेतला आहे, आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो. निवडणुकीतील विजयानंतर मी बळवंत वानखडे यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत, असं त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल”, असा विश्वासदेखील व्यक्त केला.

“माझा कुणाशीही सामना नाही”

आगामी काळात अमरावतीत यशोमती ठाकूर विरुद्ध नवनीत राणा असा राजकीय सामना बघायला मिळेल का? असं विचारलं असता, “माझा कुणाशीही सामना नाही. मी जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहील”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – बच्चू कडूंनी सांगितलं नवनीत राणांच्या पराभवाचं कारण, म्हणाले, “त्यांनी जर..”

यशोमती ठाकुरांनीही चालवला होता धनुष्यबाण

दरम्यान, अमरावतीत काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर मोठा रोड शो करण्यात आला होता. यावेळी यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांप्रमाणेच गाडीवर उभं राहून धनुष्यबाण चालवण्याची कृती केली होती. ही कृती एकप्रकारे नवनीत राणा यांना प्रत्युत्तर असल्याचं बोललं जातं होतं.

बळवंत वानखडेंकडून नवनीत राणांचा पराभव

अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांनी १९ हजार ७३१ मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बळवंत वानखडे यांना एकूण ५ लाख २६ हजार २७१ मतं मिळाली होती, तर नवनीत राणांना यांना एकूण ५ लाख ६ हजार ५४० मतं मिळाली होती. नवनीत राणा यांनी वेळी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.