Ajit Pawar On Sunil Shelke : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. वेगवेगळ्या मतदारसंघात नेत्यांच्या सभा आणि मेळावे सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला आहे. यातच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना विधानसभेला होण्याची शक्यता आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

अशातच एका-एका मतदारसंघामधून अनेक उमेदवार इच्छुक असल्याचंही पाहायला मिळत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार सुनील शेळके यांनी इच्छुक उमेदवारांसह विरोधकांना सभेतून बोलताना इशारा दिला आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत आमदार सुनील शेळके यांचे कान टोचले आहेत. “जरा सबुरीनं घ्यायचं असतं. कोणाला नाराज करायचं नाही”, असं म्हणत अजित पवारांनी सुनील शेळके यांचे कान टोचले.

हेही वाचा : “वांग्याची, हरभऱ्याची भाजी बनवली, भाकऱ्या थापल्या”, राहुल गांधीनी कोल्हापुरात टेम्पोचालकाच्या घरात बनवला स्वयंपाक

सुनील शेळके काय म्हणाले?

“तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत असताना मावळच्या मायबाप जनतेला दहशतीखाली आणू नका. मावळच्या मायबाप जनतेला दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न तुम्ही कराल तर आज व्यासपीठावरून सांगतो, माझी मायबाप जनता प्रेमळ आहे. एखाद्याला जीव लावते आणि एखाद्याचा कार्यक्रम करते. कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरील अन्याय सहन करणार नाही. प्रत्येकजण मरायला आलेला आहे. जर तुम्हाला दहशत कारायची असेल आणि दादागिरी करायची असेल तर माझ्यावर करा. मात्र, मायबाप जनतेला आणि माझ्या सहकाऱ्यांवर दादागिरी करायची नाही”, असं आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं.

अजित पवार काय म्हणाले?

दरम्यान, महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे मतदारसंघात अनेकदा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळतं. असाच प्रकार मावळ मतदारसंघातही सुरु असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना आमदार सुनील शेळके यांनी इच्छुक उमेदवारांसह विरोधकांना इशारा दिला. मात्र, यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, “आज आमच्या सुनील शेळके यांची गाडी जरा गरम होती. पण जरा सबुरीनं घ्यायचं. आपल्याला सर्वांची गरज आहे. आपल्याला कोणालाही नाराज करायचं नाही. कारण त्यामधून फार काही साध्य होत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की खूप काम केलं आणि कुठेतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.