कानडी जनता जर आक्रमक भूमिका घेत असेल, तर महाराष्ट्रातील जनतेने आक्रमकता सोडलेली नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. हा वाद लवकरात लवकर मिटला नाही, तर आम्हीदेखील शरद पवारांसह कर्नाटकात जाऊ असा इशाराही एकनाथ खडसे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शरद पवारांनी ४८ तासांच्या आत हा प्रश्न सोडवा, अन्यथा स्वत: कर्नाटकात जाणार असल्याचा अल्टिमेटम दिला आहे. आम्हीदेखील त्यांना सोबत देत कर्नाटकपर्यंत जाऊ,” असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. “राज्य सरकारने बोटचेपीची भूमिका घेतली आहे. दोन्ही बाजूला भाजपाचं सरकार आहे. पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुन हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. पण राज्य सरकार प्रामाणिकरणे, गांभीर्याने याकडे पाहत नसल्याचं दिसत आहे,” अशी टीकाही खडसेंनी केली आहे.

आमच्या संयमाचा अंत पाहू नका: शरद पवार

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सीमा प्रश्नाबाबतची विविध विधाने देशाचे ऐक्य धोक्यात आणणारी आहेत. त्यातून काही अघटित घडल्यास त्यास बोम्मई जबाबदार असतील. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले पाहिजेत. आम्ही संयम राखतो. पण, आमचाही संयम सुटू शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. ‘अरे’ला ‘कारे’ हे उत्तर द्यायची हिंमत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, असे नमूद करत अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याची तारीख जाहीर करण्याची मागणी केली.

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला!; राज्यातील वाहनांवर कन्नडिगांचा हल्ला; राज्यभर तीव्र पडसाद

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की “सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना हे प्रकार घडणे चुकीचे आहे. देशात संविधानाने कोणालाही कुठेही जाण्याचा, राहण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. कोणतेही राज्य कोणालाही रोखू शकत नाही. संविधानातील तरतुदींचे पालन राज्य सरकार करीत नसेल, तर आम्हाला केंद्राकडे जावे लागेल. याबाबत मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे”.

मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, लवकरच भेट

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला हिंसक वळण लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात मंगळवारी रात्री दूरध्वनीद्वारे चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये शांतता राखण्याबाबत त्यांच्यात मतैक्य झाले. ट्रकवरील हल्ल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले आहे. शिंदे आणि बोम्मई यांची लवकरच भेट होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp eknath khase on maharashtra karnataka border dispute sharad pawar maharashtra government sgy