राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केलं आहे. शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर होत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार-खासदार शिर्डीत दाखल झाले आहेत. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात या शिबिरात विचारमंथन होणार आहे. मात्र, हे शिबीर सुरू होण्याआधीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पक्ष कसा फुटेल?”

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार असल्याच्या सत्ताधारी पक्षातील काही नेतेमंडळींच्या दाव्याचा समाचार घेतला. राष्ट्रवादी पक्ष खंबीर असून तो फुटणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. “आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही”, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी सध्या राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार राष्ट्रवादीच्या या अधिवेशनानंतर पडेल, असं सूचक भाकित केलं आहे. “आपल्याच गावाचा असा पायगुण आहे असं स्वत:च जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं”, असं म्हणत जयंत पाटलांनी शिर्डीतील विद्यमान खासदारांना टोला लगावला.

“शिर्डीला आम्ही सांगणार आहे की तिथे एक अधिवेशन झालं, सरकार पडलं. हे मान्य आहे. पण आता हे अधिवेशन झाल्यावर सरकारच पडणार. पक्ष कसा फुटेल? आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही. आता काँग्रेसचं अधिवेशन झालं, तेव्हा माहिती नाही, कुणाचं सरकार होतं. पण ते पडलं. आता आमचं अधिवेशन झालं, तर सध्याचं सरकार पडेल”, असं विधान जयंत पाटील यांनी यावेळी केलं.

अमोल मिटकरींचा दुजोरा

दरम्यान, जयंत पाटील यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी टीव्ही ९ शी बोलताना दुजोरा दिला आहे. “सध्याच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. आज कार्तिकी एकादशी आहे. आषाढी आणि कार्तिकीची महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात. पण येणाऱ्या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करतील. देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करावी लागली. कदाचित येणाऱ्या काळात त्यांच्या भाग्यात ही पूजा नसेल. आम्हाला विश्वास आहे की आम्ही इथे १०० आमदारांच्यावर इथे आमदार निवडून आणू. आगामी काळात राष्ट्रवादीचेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसतील”, असं अमोल मिटकरी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jayant patil claims eknath shinde devendra fadnavis government will collapse pmw
Show comments