राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूच्या आमदारांनी अभिभाषणावर आपापली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातील एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था या उल्लेखावर आक्षेप घेतला. महाराष्ट्रात एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था अस्तित्वात येणं हे अवघड लक्ष्य असल्याचं नमूद करतानाच त्यांनी राज्यपालदेखील हे भाषण वाचताना विचार करत असतील,असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

जयंत पाटलांनी मांडला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा

राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणातील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियनपर्यंत पोहोचवण्याच्या निर्धाराविषयी भाष्य केलं. “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करायची आहे हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे हे राज्यपालांच्या भाषणातच आहे. म्हणजे ते लक्ष्य अवघड आहे हे राज्यपालांनी मान्य केलं आहे. त्यामुळे हा एक ट्रिलियनचा दावा वास्वववादी नाही हे अप्रत्यक्षपणे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

“एक ट्रिलियनसाठी १७ टक्के विकासदर गरजेचा”

दरम्यान, जयंत पाटील यांनी मित्रा संस्थेनं सादर केलेल्या अहवालाचा दाखला देत एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य महत्त्वाकांक्षी असल्याचं नमूद केलं. “मित्रा नावाच्या आपल्या संस्थेनं एक अहवाल दिलाय. राज्यात ६ वर्षांत १.५३ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक असेल, तरच महाराष्ट्रात एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ शकते. त्यासाठी महाराष्ट्राचा विकासदर १७ टक्के झाला पाहिजे. तरच आपण २०२७-२८ वर्षापर्यंत एक ट्रिलियनपर्यंत पोहोचू शकतो. नाहीतर तसं आपण ३२-३४ साली कधीतरी पोहोचणारच आहोत. ते आपोआपच होईल”, असं जयंत पाटील म्हणाले.

“हरलेले लोक येड्यासारखे पेढे वाटतायत”, मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत टोला; म्हणाले, “विजयराव, तुम्ही तरी…”

“महाराष्ट्रात सात-साडेसात टक्के विकासदर आहे. तो सतरा टक्के झाला तर २०२७-२८ साली आपण एक ट्रिलियनवर पोहोचू याचं राज्यकर्त्यांना भान आणून देणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या काळात काही एक ट्रिलियन होत नाही. ते व्हावेत यासाठी काही प्रयत्नही होत नाहीत”, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

“राज्यपालांची त्यांच्या भाषणातून फसवणूक होतेय”

“वारंवार राज्यपालांच्या भाषणात असे मुद्दे घालून राज्यपालांचीही फसवणूक होत आहे. त्यांना भाषण वाचतानाही वाटत असेल की हे काय लिहिलंय आणि मी हे काय वाचतोय. सध्याचे राज्यपाल फार चांगले आहेत. तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेची चर्चा करा. नाही त्यांनी मी जे सांगतोय ते सांगितलं तर माझं नाव बदलेन मी. त्यांचंही मत हेच असेल. ‘क्या बोल रहे है, क्या लिख रहे है. लेकिन मुझे पढना पड रहा है’ असं ते म्हणत असतील. म्हणतात असा माझा दावा नाही. हा अंदाज आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हणताच विरोधी बाकांवर आमदारांमध्ये हशा पिकला.

“एक ट्रिलियन अर्थव्यवस्था झाली तर त्याचे लाभार्थी कोण असतील? हे एकदा सांगा. राज्यात बेरोजगारी राहणार असेल, कुपोषणामुळे बळी जात असतील, तरुणांचे प्रश्न राहणार आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर या अर्थव्यवस्थेचे लाभार्थी कोण असतील?” असा सवालही जयंत पाटील यांनी केला.