राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांबाबत एक सुचक वक्तव्य केलं आहे. शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. काही दिवसात खरं, खोटं काय ते समोर येईल, असे पवार म्हणाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटातील सर्व आमदारांची मंत्रिपदाची मागणी आहे. त्यामुळे सरकार टिकणं कठिण असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला १०० दिवस झाले आहेत. स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार आणि नाना पटोले याबाबत भाष्य करत आहेत. मात्र अजुनपर्यंत काहीही झालेलं नाही” असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवरुनही अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. “सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला नकोत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. भविष्यातील नवे सरकारही जुन्या सरकारकडे बोट दाखवत हा पायंडा कायम ठेवतील. त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल, असा इशाराही पवार यांनी सरकारला दिला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकासआघाडी सरकारने दिलेला निधी रद्द करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. यावरुन अजित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.