एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला आज ( २० जून ) एक वर्ष झालं. यानिमित्ताने शिवसेनेकडून ( शिंदे गट ) ‘स्वाभीमान दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघाला हा दिवस ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, यासाठी पत्र लिहिलं आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राज्यात ‘गद्दार दिन’ साजरा केला जात आहे.
अशातच आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,” असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे”, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं टीकास्र; म्हणाले, “अडीच वर्षं…!”
“ज्या पक्षाची स्थापन मुळात गद्दारीतून झाली, ते…”
संजय शिरसाट म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा का पुळका आला, हे मला कळायला मार्ग नाही. जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. ज्या पक्षाची स्थापन मुळात गद्दारीतून झाली, ते आम्हाला गद्दारीची भाषा शिकवत आहेत. हे सर्व हास्यास्पद आहे. याची चिंता आम्ही करत नाही.”
हेही वाचा : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आशिष शेलारांचा ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, “मुंबईकरांसमोर उघडे…”
“…म्हणून जयंत पाटील रडत होते”
“शरद पवारांनी राजीनामा दिल्यावर जयंत पाटील का रडत होते? कारण, उद्या काय घडणार याची माहिती जयंत पाटलांना होती. म्हणून ते रडत होते. शरद पवारांनी राजीनामा दिला म्हणून जयंत पाटील रडत नव्हते. काही दिवस वाट पाहा, जयंत पाटलांचं मार्गक्रमण कुठेतरी झाल्याचं दिसेल,” असेही संजय शिरसाटांनी सांगितलं.