Jayant Patil On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून सर्वांच लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज पत्रकार परिषद घेत जाहीर केला. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. तसेच २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. याबाबतची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.

जयंत पाटील काय म्हणाले?

निवडणुकीची घोषणा होताच राजकीय प्रतिक्रिया येत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रतिक्रिया देत महायुतीला मोठा इशारा दिला आहे. “आता एका टप्प्यात पराभूत होतील”, असं जयंत पाटील यांनी महायुतीला उद्धेशून म्हटलं आहे.

हेही वाचा : ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला

जयंत पाटील काय म्हणाले?

“महायुतीचे सरकार घाबरले आहे. महायुती पाहिजे त्या घोषणा करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे आता ते (महायुती) एका टप्प्यात पराभूत होतील”, असा इशाराच जयंत पाटील यांनी महायुतीला दिला.

दरम्यान, जयंत पाटील यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेवरूनही महायुतीवर निशाणा साधला. तसेच आम्ही लाडकी बहीण योजनेला कोणताही विरोध केलेला नाही. उलट आम्ही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहि‍णींना महायुतीने दिलेल्या लाभापेक्षा जास्त फायदा लाडक्या बहि‍णींचा कसा होईल, यासाठी आम्ही आमचं सरकार आल्यानंतर उपाययोजना करण्याचं काम करणार आहोत, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात निवडणूक कधी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२४ तर उमेदवारी अर्ज पडताळणी ३० ऑक्टोबर २०२४ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ तर मतदानाची तारीख २० नोव्हेंबर २०२४ आणि मतमोजणीची तारीख २३ नोव्हेंबर २०२४ असणार आहे.