मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. मनसे सत्तेत आली पाहिजे, यासाठी आपण २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत, अशी घोषणाच त्यांनी केली. मात्र, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “राज ठाकरे हे राजकारणाला चित्रपट समजतात”,अशी बोचरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“राज ठाकरे यांची भूमिका दर पंधरा दिवसाला बदलत असते. त्यामुळे त्याबाबत आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. आता महापालिकेच्या निवडणुकीमध्येही त्यांची आणखी काही वेगळी भूमिका असेल. अभिनेते कसे त्यांची भूमिका चित्रपटानुसार बदल असतात. तसं राज ठाकरे अभिनेते आहेत”, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
लाडका भाऊ आणि बहीण योजनेवरुन टीका राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आम्हालाही वाटतं की दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर बरं झालं असतं. राज ठाकरे हे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवत असले तरी महायुतीवर दबाव वैगेरे काही करत नाहीत. मराठी मते तुम्ही फोडा असं सगळं हे ठरवून आहे. आता सगळे सर्व्हे येत आहेत ते सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात येत आहेत. त्यांचे जेवढे वयक्तिक सर्व्हे आहेत ते देखील त्यांच्या विरोधात येत आहेत. त्यामुळे अशी प्यादी वापरायची अशी भाजपाची सवय आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भूमिका बदलनं हे राज ठाकरेंच्या रक्तात आहे. त्यांचे वडील श्रेष्ठ गीतकार होते. त्यांनी चांगली गाणी लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अंगात कला आहे. ते कधी ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये कधी अमिताभच्या भूमिकेत असतात. कधी ते ‘दिवार’मधील अमिताभची भूमिका करतात. कशी ते ‘शोले’ मधला रोल करतात. त्यामुळे ते अशा विविध भूमिकेत असतात. ते राजकारणाला चित्रपट समजतात”, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि घमासान असलेली होणार आहे. या निवडणुकीत मला आपले आमदार निवडून आलेले पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. काय घडतं आहे, काय घडू शकतं? याचं आकलन करा. मी तुम्हाला खरं सांगतो निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकिट मिळेल. तिकिट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कुणालाही तिकिट दिलं जाणार नाही. तुम्ही जे बोलाल जे सांगाल जे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी नीट माहिती द्या. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे पदाधिकारी आणि आपले लोक सत्तेत बसावयचे आहेत. अनेक लोक हसतील हसुदेत काही प्रश्न नाही. मात्र हे घडणार म्हणजे घडणार”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.