राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षाचं चिन्ह असलेलं घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलं आहे. शरद पवार गटासाठी हा एक धक्का मानला जातो आहे. अशात नवं नाव घेऊन शरद पवारांनी वाटचाल सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव आता त्यांच्या पक्षाला मिळालं आहे. तसंच आम्ही पुन्हा लढू आणि पुन्हा उभे राहू असा विश्वासही शरद पवार गटाने व्यक्त केला आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? असा प्रश्न विचारत अजित पवारांना टोला लगावला आहे. काय म्हणाले सुप्रिया सुळे? बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत त्यांना विचारलं असता "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला. तो पक्ष घेतला. तसंच उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्षही काढून घेतला. स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?" असा सवाल सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं नाव न घेता केला आहे. आमच्यावर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे संस्कार श्रीराम त्यांच्या वडिलांच्या वचनासाठी १४ वर्षांच्या वनवासाला गेले. आपल्यावर हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार आहेत. आज ते आपला पक्षही घेऊन गेले आणि चिन्हही घेऊन गेले. आता लोक विचारतात नवं चिन्ह कसं पोहचवणार? चिन्ह आपण पोहचवू काळजी करु नका. आपण नव्याने पक्ष उभा करु, नवीन चिन्ह घेऊन नव्या जोमाने उभे राहू. आमची सगळ्यात मोठी ताकद इमानदारी आहे. ते सगळं घेऊन जातील पण इमानदारी कशी काय नेतील? असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे आणि अजित पवार गटाला टोला लगावला आहे. हे पण वाचा- गुगल पे, फोनपेला टाईम बॉम्ब म्हणत सुप्रिया सुळेंचा संसदेत मोठा दावा, मोदी सरकारला विचारला महत्त्वाचा प्रश्न ट्रिपल इंजिन सरकारने कुठली मर्यादा आज ठेवली आहे? महिलांवरचे अत्याचार, गोळीबार या घटना राजरोसपणे घडत आहेत. गुंडराज महाराष्ट्रात आहे पण आम्ही याविरोधात लढा देत आहोत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींमध्ये असंवेदनशीलपणा आलेला आहे. सरकार बदलणं हाच या सगळ्यावरचा उपाय आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.