बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे. सोशल मीडियासह आता राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावरही मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केले. जॉब दो.. मोदी सरकार जवाब दो… राष्ट्रवादीची एकच पुकार जॉब दो… ये आझादी झुठी है… ये सरकार बदलनी है…अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसने #जॉबदो #जवाबदो या हॅशटॅगचा वापर करत मोदी सरकारवर टीका केली. समृद्धीपेक्षा बेकारीचा महामार्ग लांबलचक, असे खोचक ट्विट राष्ट्रवादीने केले. देशातील रोजगाराविषयी प्रसिध्द झालेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. बेरोजगारीचा हा दर गेल्या ४५ वर्षात सर्वाधिक असल्याचा दावा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून (NSSO’s) करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी बेरोजगारीचा हा सर्वाधिक दर तुमच्या सत्ताकाळात आहे, असे ट्विटमध्ये म्हटले होते.
समृद्धीपेक्षा बेकारीचा महामार्ग लांबलचक…
पंतप्रधान मोदीजी… #जॉबदो #जवाबदो@narendramodi @PMOIndia #Unemployment #Samruddhi pic.twitter.com/ECccziIY2U
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 12, 2019
सोशल मीडियावर मोहीम राबवली जात असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात बेरोजगारीविरोधात आंदोलन छेडले आहे. त्याची सुरुवात मुंबईतील प्रदेश कार्यालयापासून करण्यात आली. मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. जॉब दो.. मोदी सरकार जवाब दो… राष्ट्रवादीची एकच पुकार जॉब दो… ये आझादी झुठी है… ये सरकार बदलनी है…अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाच पोलिसांनी सर्वांना अटक केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.