महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांना तेल लावलेला पैलवान म्हटलं जातं. परिस्थिती जेव्हा जेव्हा विपरित असते, तेव्हा तेव्हा शरद पवार राजकीय पटलावर आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत असतात. २०१९ चा महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग असो किंवा अजित पवारांनी फूट पाडल्यानंतर लोकसभेत मिळवलेले यश असो, शरद पवारांच्या राजकीय चातुर्याची ही अलीकडील उदाहरणे आहेत. शरद पवारांचे राजकीय डावपेच हे भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फारसे यश मिळणार नाही, असे सांगितले जात असतानाच त्यांनी १० पैकी ८ जागा जिंकून अनेकांना बोटं तोंडात घालायला लावली. निकालानंतर कोल्हापूरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापूरी शैलीत शरद पवारांची स्तुती करताना विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅनरवर मजकूर काय?

कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरच्या दाभोळकर चौक परिसरात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. “सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं…”, असा एका ओळीचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. शरद पवारांचा फोटो आणि एका बाजूला पक्षाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्हही आहे. रात्री हे बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

या बॅनरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. तसेच या एका ओळीतून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत काय केलं? याची प्रचिती येत आहे.

‘एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार’, काँग्रेस नेत्याचं मोठं विधान; फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…

कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शरद पवार यांचे आजोळ असल्यामुळे त्यांना हा जिल्हा अतिशय जवळचा वाटतो. कोल्हापूरच्या कागलमधील पवारांचे खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी हसन मुश्रीफ यांनी फूट पडल्यानंतर अजित पवार यांची साथ दिली. एकेकाळी पवारांचा शब्द खाली पडू न देणाऱ्या मुश्रीफ यांनी त्यानंतर शरद पवार गटावर अनेकदा बोचरी टीका केली आहे. कोल्हापूरच्या निवडणुकीत शरद पवारांनी छत्रपती शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तजवीज करून महायुतीला पहिला धक्का दिला. निकालानंतर छत्रपती शाहूंनी मोठा विजय मिळविल्याचे याठिकाणी दिसले. ही शिवसेनेची जागा असूनही मविआने कोणताही शाब्दिक संघर्ष न करता एकमताने महाराजांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे हा विजय सोपा झाला.

याचप्रकारे बारामती, शिरूर, अहमदनगर, माढा, बीड, दिंडोरी, वर्धा आणि दिंडोरी या मतदारसंघात शरद पवारांची तुतारी वाजली. साताऱ्याची जागा ३२ हजारांच्या फरकाने गमवावी लागली असली तरी पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा इतर सर्व पक्षांच्या तुलनेत अधिक राहिला आहे.

देवेंद्र फडणवीसांचे राजीनामानाट्य सुरूच

बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांच्या उमेदवारांत थेट लढत होती, या दोनही मतदारसंघात अनुक्रमे सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांचा सहज विजय झाला. २०१९ नंतर अजित पवार यांच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीचा यावेळी पराभव झाला आहे, त्यामुळे हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो. एकेकाळी शरद पवारांचे दिवसरात्र गुणगाण गाणारे नेते फूट पडल्यानंतर त्यांच्याच विरोधात बोलायला लागले, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांच्या पदरी निराशा आली. कोल्हापूरमधील बॅनरवरून एका ओळीत या नेत्यांना शरद पवारांच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्यात आल्याची चर्चा आता रंगत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar faction take a dig on bjp and ajit pawar group flash posters in kolhapur kvg
Show comments