राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. त्यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलं होतं.त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच बजरंग सोनवणे यांनी ‘अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?’, असा सणसणीत टोला लगावला आहे.

बजरंग सोनवणे काय म्हणाले?

“अमोल मिटकरी कोण आहेत? अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? अमोल मिटकरी कोण आहेत हेच मला माहिती नाही. अजित पवारांच्या बंगल्यावर ऑपरेटर म्हणून एखादे अमोल मिटकरी असतील. त्यामुळे अजित पवारांना दिवसभरात किती आणि कोणाचे फोन येतात, याचे रेकॉर्ड त्यांच्याकडे असेल. मात्र, अमोल मिटकरी कोण आहेत हे पहिल्यांदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे”, अशी खोचक टीका बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरींवर केली. तसेच त्यांचा बोलवता धनी कोण? हेही मिटकरींनी सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : मिटकरींनी बजरंग सोनवणेंबाबत केलेल्या विधानानंतर तटकरेंचंही सूचक विधान; म्हणाले, “अजित पवार आणि माझ्या संपर्कात…”

…तर जनता चपलेने मारेल

“अमोल मिटकरींनी ट्विटमध्ये काय म्हटलं? शरद पवारांचा एक खासदार अजित पवारांच्या संपर्कात आणि लवकरच काय ते कळेल. आता मला एक सांगा, बीड जिल्ह्यातील जनतेनं माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे, त्यामधून कितीही उतराई करण्याचा प्रयत्न केला तरी मी कमी पडेल. माझ्या मनात काही असतं आणि मी माझ्या बंगल्याच्या बाहेर वेगळा विचार करून गेलो तर बीड जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलेने फोडेल. ते जाऊद्या मी शरद पवारांना सोडायचं म्हटलं तरी माझे वडील माझ्या कानशि‍लात लगावलीत आणि माझी बायको म्हणेल की तुम्हाला खायलाही मिळणार नाही, नाश्तादेखील नाही, अशी परिस्थिती होईल”, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली.

सोनवणे पुढं म्हणाले, “कुणाशिवाय कुणाला पर्याय नाही, हा विषय वेगळा आहे. राजकारणाच्या पलिकडे काही विषय असतात. पण राजकारणावर का आणतात? त्यांनी ट्विटमध्ये अजून हेही म्हटलं की, बजरंग सोनवणे यांचा कारखाना अडचणीत आहे. जर मी अडचणीत असतो तर प्रवाहाच्या विरोधात जाऊन एवढा मोठा निर्णय घेतला असता का? शरद पवार आणि जयंत पाटील यांनी सांगितलं आणि मी बीड लोकसभेची निवडणूक लढलो, त्यामुळे हा काही विषय येत नाही”, असंही बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केलं.