विश्वास पवार

वाई: सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पारंपारिक बालेकिल्ला. पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. यंदा प्रथमच भाजपच्या वतीने उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात यश प्राप्त केले आहे. साताऱ्यात मान गादीला आणि मतही गादीला असे चित्र पाहायला मिळाले.

सन २०१९ च्या पराभवाचे उट्टे काढत उदयनराजेंनी विजय मिळवला. मागच्या वेळी पावसाची सभा आणि श्रीनिवास पाटलांसारखा तगडा उमेदवार यामुळे राष्ट्रवादी तरली होती. आताही मतदारसंघात अशीच परिस्थिती होती. मताधिक्य मिळायला लागताच कोरेगावात शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले. त्यांनी गुलालाची उधळण केली. फटाके फोडले. शशिकांत शिंदेंनाही गुलाल लावला. कोरेगावात कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. कोरेगाव, सातारा, वाई, कराड, जावळी येथे विजयाचे फलक लागले. शशिकांत शिंदे साताऱ्याकडे निघाले. मात्र, मताधिक्य घटत असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि ते पुन्हा आपल्या ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील घरी गेले. हे असे एकदम कसे झाले याचेही सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>>“RSS ने निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्त्वबदल हवाय”, सुप्रिया सुळेंचं विधान; शंभूराज देसाई म्हणाले, “ही माहिती…”

सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना मताधिक्य मिळणार हे नक्की होते. हे मिळालेले मताधिक्य वाई, पाटण, कोरेगावमध्ये शिंदेंना तोडता आले नाही. आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव खटावमध्ये उदयनराजेंचा जोरदार प्रचार केल्याने शिंदेंना मताधिक्य मिळू शकले नाही. तिथेही उदयनराजे यांनीच मताधिक्य मिळविले. सातारा जावळीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळल्याचा फायदा उदयनराजेंना झाला. आमदार मकरंद पाटील यांनीही काम केले; परंतु वाई-खंडाळ्यातून शशिकांत शिंदेना अनपेक्षित सात हजाराची आघाडी मिळाली. कराड उत्तर मतदारसंघात आमदार बाळासाहेब पाटील यांनी शिंदेंना चांगली साथ दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘कराड दक्षिण’मध्येही सहाशे मतांनी उदयनराजे आघाडीवर राहिले.

महायुतीच्या चार आमदारांनी उदयनराजेंचे मनापासून काम केले. त्यामुळे शशिकांत शिंदे निवडून येणार हे जनमत चाचणीत आणि माध्यमातील चर्चांमध्येच राहिले. प्रत्यक्षात मतदानामध्ये ते उतरले नाही. शशिकांत शिंदे उदयनराजेंपुढे कुमकुवत ठरले. उदयनराजेंची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. मात्र, तत्पूर्वीच उदयनराजेंनी मतदारसंघ ढवळून काढला होता. साताऱ्याच्या निवडणुकीमध्ये कराड, वाईला फार महत्त्व आहे.

जावळीत अल्प मते

कराडचा उमेदवार नसल्याचा फटका शरद पवार गटाला बसला. त्याचप्रमाणे शिंदेंना पहिल्यापासून मोठे मताधिक्य नव्हते. त्यामुळे साताऱ्यातील फेऱ्यांमध्ये उदयनराजेंना हे मताधिक्य तोडणे सहजशक्य झाले. पाटण, कराड उत्तरमधील शिंदेंना मिळालेले मताधिक्य अल्प होते. त्यामुळे सर्वच मतदारसंघांतून उदयनराजेंनी बाजी मारली. निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात वातावरण होते. मात्र, त्यासाठीची मतांची जुळवाजुळव करणे शशिकांत शिंदेंना शक्य झाले नाही. त्यांची भिस्त असणाऱ्या जावळी मतदारसंघातही त्यांना मताधिक्य घेता आले नाही.