शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार नितीन देशमुख यांनी सत्तांतराबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं, असं देवेंद्र फडणवीस सांगतात. पण, सरकार पाडायचं एवढेच देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं. मुख्यमंत्री कोण होणार, हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं,” असं नितीन देशमुख यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये नितीन देशमुख बोलत होते. “देवेंद्र फडणवीस सांगतात, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होतं. हे सपशेल चुकीचं आहे. सत्तांतराच्या एक महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, याची आम्हाला माहिती होती. देवेंद्र फडणवीसांना याची माहिती नसेल. पण, स्वत: एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं,” असं नितीश देशमुख म्हणाले.
“…हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं”
“देवेंद्र फडणवीस माध्यमांना सांगतात, एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं. मात्र, देवेंद्र फडणवीसांना सरकार पाडायचं, एवढंच माहिती होतं. मुख्यमंत्री कोण होणार, हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं,” अशी माहिती नितीश देशमुख यांनी दिली.
“उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना घडवलं”
“आमची ओळखच शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंना ‘मातोश्री’ने घडवलं. जिल्हाप्रमुख, आमदार, कॅबिनेमंत्री आणि मुख्यमंत्रीनंतरचं नगरविकास मंत्रीपद दिलं. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना घडवलं. त्यांच्याशी ते प्रमाणिक राहिले नाहीत. आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर गेले असतो, तर आमच्याशी किती प्रामाणिक राहिले असते. आमची ओळख फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे,” असं नितीश देशमुख यांनी म्हटलं.
हेही वाचा : “धुळे आणि नंदूरबारला राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही, अन् म्हणे…”, अजित पवारांची तुफान टोलेबाजी
“उदय सामंत आणि संजय गायकवाड यांचा शिवसेनेशी काय संबंध?”
“अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांचा हिंदुत्वाशी काय संबंध? उदय सामंत आणि संजय गायकवाड यांचा शिवसेनेशी काय संबंध? हे लोक म्हणतात आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचे आहे. तर, महाराष्ट्रातील तरुण वर्गाला सर्व समजते,” असेही नितीन देशमुख म्हणाले.