महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा घ्यायला नको अशा आशयाचं पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी UGC ला लिहिलं आहे. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव ज्या प्रकारे वाढतो आहे तो लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि हिताच्या दृष्टीने आम्ही विचार करतो आहोत. अशा परिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नाही हेदेखील आम्ही UGC ला कळवलं आहे असंही उदय सामंत यांनी सांगितलं. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जो संवाद साधला त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. काय म्हटलं आहे पत्रात? कोविड १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि त्या अनुषंगाने झालेल्या लॉकडाउनमुळे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने सर्व आकृषी विद्यापीठांमधील परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाच्या नियोजनाबाबत महाराष्ट्र सरकारने समिती नेमली होती दि. ८ मे रोजी शासनाने सदर समितीचा अहवाल स्वीकृत केला. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा यांचे गांभीर्य लक्षात घेऊन अकृषी विद्यापीठांमधल्या पदवीपूर्व, पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना पुढे प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सद्यस्थितीत कोविड १९चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यस्तरीय समितीच्या शिफारसीनुसार पदवीपूर्व, पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेणे कठीण वाटते आहे. महाराष्ट्रातल्या ८ ते १० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं तेही कोविडच्या काळात ही बाब व्यवहार्य वाटणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे संयुक्तिक ठरणार नाही महाराष्ट्रातील कोविड १९ विषाणूचा वाढता संसर्ग, सोशल डिस्टन्सिंग निकषांचे पालन करुन राज्यातील ८ ते १० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यातली अव्यवहार्यता, तसेच विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांचा विचार करुन अंतिम वर्षांच्या परीक्षाही न घेता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्रेट प्रदान करणे या पर्यायाला मान्यता द्यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.