अहिल्यानगर : महापालिकेच्या नगररचना विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा शहरातील वर्दळीच्या माळीवाडा बसस्थानक नूतनीकरणाच्या कामात दिरंगाई निर्माण झाली असून, मनपाने दोन दिवसांत ना हरकत दाखला न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला आहे. भोसले यांनी तसे पत्रही मनपा आयुक्तांना दिले आहे.
यासंदर्भात माहिती देताना माजी उपमहापौर भोसले यांनी सांगितले, आमदार संग्राम जगताप सातत्याने पाठपुरावा करून शहर विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणत आहेत. मात्र, मनपा प्रशासनाला विकासकामांशी काहीही देणेघेणे नाही. आमदार जगताप यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी माळीवाडा बसस्थानक नूतनीकरणासाठी १६.५० कोटींचा निधी राज्य सरकारकडून अथक परिश्रमाने मंजूर करून आणला.
मात्र, अनेक महिन्यांपासून हे काम मनपाच्या उदानसीतेमुळे रखडले आहे. केवळ नगररचना विभागाच्या ना हरकत दाखल्याअभावी बसस्थानक नूतनीकरणास दिरंगाई होत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना रोज बसची वाट बघत उन्हात उभे राहावे लागत आहे. याला मनपाचा ढिसाळ व निष्क्रिय कारभार जबाबदार आहे. नगररचना विभागातून दोन-दोन महिने फाईल पुढे सरकत नाही; साधी एनओसी अधिकाऱ्यांना देता येत नाही. हा अक्षम्य प्रकार आहे, असा संताप भोसले यांनी व्यक्त केला.
बसस्थानक इमारत नूतनीकरणास निधी मंजूर झाल्याने बस स्थानकाची जुनी इमारत पाडण्यात आली. नव्या इमारतीच्या कामास त्वरित सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, मनपा प्रशासनाची उदासीनता व नगररचना विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे माळीवाडा बसस्थानकाचे काम रखडले आहे.
त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षांवर व आमदारांच्या प्रयत्नांवर असे पाणी फिरवणे योग्य आहे का? मनपा यंत्रणा अशीच चालणार असेल, तर विकासासाठी जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचं ? नगररचना विभागातील बोगस कारभार योग्य आहे का? काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे कितपत योग्य आहे? असे प्रश्न गणेश भोसले यांनी मनपा आयुक्तांना विचारले आहेत.