कोकणातील रिफायनरी प्रकल्पवारून राजकीय घमासान सुरू आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात उघड उघड शाब्दिक चकमकी घडत आहेत. त्यातच, आज उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. बारसूतील ग्रामस्थांची भेट घेत त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीकाही केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. तेव्हा ३३ देश काय महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील लोकही यांना ओळखत नव्हती. जेव्हा (समृद्धी महामार्गावेळी) विरोधाला लोक रस्त्यावर उतरली, माझ्याकडे धावत आली होती, तुम्ही आल्याशिवाय प्रकल्प होणार नाही असं ते म्हणाले. तेव्हा संभाजी नगर, जालन्यात आम्ही फिरलो. ज्याची नोंद कागदावर ओसाड म्हणून केली होती, तिथे मोसंबीच्या फळबागा होत्या, त्यामुळे त्यांची मोबदल्याची मागणी होती. यामुळे आम्ही मुंबईत बैठक घेतली. त्या फळबागा वाचवून बाजूने तो रस्ता कसा जाईल, याची आखणी केली. तो विरोध आम्ही मोडून नाही काढला. तो समजून घेतला, तिथल्या विरोधकांची समजूत काढून, बागा वाचवून मग तो रस्ता झाला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “आत्मचरित्र नाही, पण आत्मा विकला असेल”, नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं वाचन सुरू असताना उद्धव ठाकरेंचा टोला!

बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या. मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत असं म्हणत बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा >> “शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत त्यामुळे…” बारसूमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रकल्प चांगला असता तर आम्ही विरोध कशाला करु? मात्र ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे असं दिसतं आहे. मी पत्र दिलं होतं पण दडपशाही करुन प्रकल्प लादा म्हणून दिलं नव्हतं. निसर्गरम्य हा परिसर आहे. त्या परिसराचा, निसर्गाचा ऱ्हास करून हा प्रकल्प नको आहे. चांगल्या गोष्टी आपण जरुर केल्या. चिपी एअरपोर्टही माझ्या कालखंडात आला. इथल्या मोठ्या आणि सूक्ष्म माणसांना तो आणता आला नाही. जर एवढा चांगला प्रकल्प असेल तर तुम्ही लोकांसमोर का जात नाही? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उपऱ्यांची सुपारी घेऊन भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? ते मला मुळीच मान्य नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nobody knew in three districts now 33 countries take note of betrayal uddhav thackerays message to the chief minister sgk