लोकसत्ता वार्ताहर

अकोले : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी किसान सभेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हा आरोप करण्यात आला आहे .

शेतकऱ्यांची मतं काढून घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आज मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करता येणार नाही अशी विधाने केली जात आहेत. सरकारने केलेला शेतकऱ्यांचा हा पुन्हा एकदा नवा विश्वासघात आहे. सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी या पार्श्वभूमीवर किसान सभेने केली आहे.

माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी इतके मोठे अंथरूण राज्य सरकारचे सध्या नाही, असे विधानही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याएवढे मोठे अंथरूण राज्य सरकारचे नव्हते याची जाणीव निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन देऊन मते पदरात पाडून घेतेवेळी नव्हती का ? असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे. मते मागत असताना आपले अंथरूण किती आहे, तितकीच आश्वासने द्यावीत, असे संबंधितांना का वाटले नाही? हा प्रश्न शेतकरी समुदायातून विचारला जात आहे.

या वर्षी व पुढील वर्षी तरी कर्जमाफीची शक्यता नाही, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कालांतराने कर्जमाफीचा निर्णय घेऊ असेही अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती राज्य सरकारला आणि तमाम यंत्रणांना माहीत आहे. त्यामुळे प्रश्न शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कर्जमाफी करण्याचा नसून मतांची बिदागी मिळवण्यासाठी निवडणुकीचा हंगाम पाहून जमले तर कर्जमाफी करण्याचा हा मुद्दा आहे. निवडणुकांसाठी आणि मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवाशी होत असलेला खेळ सत्ताधाऱ्यांनी थांबवावा असे आवाहन किसान सभा करत आहे.

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथ्यावर झालेल्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी सुद्धा सरकारची आहे. सरकारने आपली जबाबदारी स्वीकारावी, मतांसाठी निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तत्काळ करावी अशी मागणी डॉ. अशोक ढवळे ,जे. पी. गावीत, उमेश देशमुख व डॉ. नवले यांनी केली आहे.