लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अद्याप १० दिवसांचा अवधी असताना विधानसभेच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षात घमासान सुरू असून पक्षांतर्गत मतभेद चव्हाटय़ावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त राहिलेल्या आमदार संभाजी पवार यांनी विधानसभेसाठी हक्क सांगताच पक्षांतर्गत विरोधकांनी सोमवारी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. लोकसभा निवडणुकीत कोणी काय केले याची माहिती घेण्यासाठी द्विसदस्यीय समिती पाठविण्याचा निर्णय विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी या वेळी जाहीर केला.
लोकसभा निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा असला, तरी भारतीय जनता पक्षात मात्र परिवर्तनाच्या आशेने फिलगुड निर्माण झाले आहे. मोदी फिव्हरचा लाभ घेण्यासाठी सांगलीमधून इच्छुकांनी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. निकाल लागण्यापूर्वीच आमदार संभाजी पवार यांनी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासोबत गोपीनाथ मुंडे यांची भेट घेऊन विधानसभेच्या उमेदवारीसाठी हक्क सांगितला आहे. त्यांना मुंडेंनी नेमका कोणता शब्द दिला हे गुलदस्त्यात असतानाच प्रसिद्धी माध्यमांद्वारे सांगलीची जागा श्री. पवार यांना व जतची जागा शेंडगे यांना दिली असल्याचे जाहीर करुन वादाला तोंड फोडले.
विधानसभा निवडणुकीला अद्याप सहा महिन्यांचा अवधी असताना सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष सध्या लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. यातच नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचा गवगवा माध्यमातून होत असल्याने सांगली भाजपमध्ये सध्या फिलगुड आहे. नेमक्या याच स्थितीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न पक्षांतर्गत गट करीत आहेत. आ. पवार व शेंडगे यांनी उमेदवारीवर हक्क सांगताच पक्षांतर्गत विरोधकांनी सोमवारी मुंबईत जाऊन वरिष्ठ पक्ष नेत्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली.
सोमवारी भेटण्यासाठी गेलेल्यांमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील, दीपक िशदे, शेखर इनामदार, सुधीर गाडगीळ, नीता केळकर, भारती दिगडे, गोपीचंद पडळकर व मकरंद देशपांडे आदींचा समावेश होता. या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रचारापासून अलिप्त राहिलेल्या मंडळींना उमेदवारीचे आश्वासन कसे दिले, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र याबाबत अद्याप चर्चाच झालेली नाही उमेदवारीचा निर्णय संसदीय बोर्डाच्या माध्यमातूनच घेतला जात असल्याचे सांगून चच्रेला पूर्णविराम दिला.
दरम्यान लोकसभा निवडणुकी वेळी कोणत्या कार्यकर्त्यांने काय काम केले याची पहाणी करण्यासाठी प्रदेश पातळीवरील द्विसदस्यीय समिती सांगलीचा दौरा करणार आहेत. या समितीपुढे  पुराव्यानिशी माहिती उपलब्ध करून द्यावी अशी सूचना श्री. तावडे यांनी या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या द्विसदस्यी समितीकडून येणाऱ्या अहवालावर स्वत तावडे यांच्यासह एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी निर्णय घेणार असून सांगलीतून गेलेले कार्यकत्रे गोपीनाथ मुंडे यांचीही भेट घेणार आहेत.

Story img Loader