सांगली : भाजपमध्ये दुर्लक्षित झालेल्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ‘दुष्काळी फोरम’ या नावाने दबाव गटाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचा समावेश आहे. या प्रमुख नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली असून, ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या गटाच्या आधारे मोर्चेबांधणी करणार आहेत. हा ‘दुष्काळी फोरम’ म्हणजे महायुतीतील असंतुष्ट गटाची वेगळी चूल समजली जात आहे.

राज्यात विकास आघाडीची सत्ता असताना तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि जयंत पाटील हेच विकास कामाचा निधी आपापल्या मतदारसंघात पळवत असल्याचा आरोप करत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘दुष्काळी फोरम’ची स्थापना करण्यात आली होती. या फोरमने मोदी लाटेवेळी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून सांगली लोकसभेच्या निवडणुकीत सत्तांतर घडवून आणले होते. यानंतर जिल्हा परिषद, महापालिका या भाजपच्या ताब्यात येण्यासाठी या गटाचे मोठे योगदान होते.

आणखी वाचा-रस्त्यात साचलेलं पाणी पाहून अमित शाहांच्या ताफ्यानं वाट बदलली; काँग्रेसच्या प्रवक्त्यानं म्हटलं, “गडकरी, शिंदेंचा विकास पाहून…”

मात्र, पक्षाध्यक्ष बदलल्यानंतर या वेळी खासदारपदाचा उमेदवार बदलावा यासाठी आग्रह होता. मात्र, तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांनाच पक्षाने संधी दिल्याने या गटाने लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली. यातून सांगली लोकसभेवेळी भाजपला पराभूत व्हावे लागले. जगताप यांनी पक्षाचा राजीनामा देऊन, तर घोरपडे यांनी उघडपणे खासदार विशाल पाटील यांचा प्रचार केला. यानंतरही पक्षाने नाराजी दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. यातून ‘दुष्काळी फोरम’ पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय प्रमुख नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

दुष्काळी फोरम हा विकासासाठी दबाव गट म्हणून काम करणार असून, पक्षनिरपेक्ष भूमिका घेणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतच हा गट प्रभावीपणे काम करणार असून, जो आमच्या भूमिकेशी संबंधित असेल त्याच्या पाठीशी ताकतीने राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फोरमची व्यापक बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असून, या वेळी फोरमची कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. -माजी आमदार विलासराव जगताप