भारताचे माजी जनरल सॉलिसिटर आणि ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांनी नुकतंच वयाच्या ६८ व्या वर्षी तिसरं लग्न केलं. त्यांचा लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पार्टीत फरार ललित मोदी दिसला. यावरून हरिश साळवे आणि पर्यायाने केंद्र सरकार संकटात सापडले आहे. यावरून हरिश साळवे यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर ललित मोदी भगोडा नाही अशी स्पष्टोक्ती काल दिली होती. परंतु, याच मुद्द्यावरून आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हरिश साळवे यांच्या विवाहाची ‘हॅटट्रिक’ केली. त्यांनी तिसरा विवाह केला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला, पण साळवे यांनी त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या प्रीत्यर्थ जी मेजवानी दिली त्यात श्रीमान साळवे यांच्या सोबतीने हिंदुस्थानला हवा असलेला भगोडा ‘चिअर्स’ करताना दिसत आहे. यावर आता मोदी-शहांचे काय म्हणणे आहे? की तेही दिल्लीत बसून साळवे-ललित मोदी जोडीस ‘चिअर्स’ करणार आहेत?” असा सवाल ठाकरे गटाने केंद्र सरकारला विचारला आहे.

हेही वाचा >> भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे पुन्हा बोहल्यावर! वयाच्या ६८ व्या वर्षी केलं तिसरं लग्न

मोदींच्या या फक्त थापाच थापा

“साधारण ४५०० कोटींच्या आर्थिक हेराफेरी प्रकरणात ललित मोदी गुन्हेगार आहे. प्रकरण अर्थात मनी लॉण्डरिंगचे आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे आणि तो आज ‘भगोडा’ आहे. असा हा देशाचा भगोडा लंडनमध्ये कायदेपंडित हरीश साळवे यांच्या मेजवानीत दिसतोय व त्याच हरीश साळवे यांना ‘वन नेशन वन इलेक्शन’ समितीत माजी राष्ट्रपती व गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबरीने स्थान मिळाले. याचा अर्थ असा की, भ्रष्टाचार उखडून काढू, परदेशात पळून गेलेल्या घोटाळेबाजांना फरफटत आणू, सर्व काळा पैसा परदेशांतून भारतात आणू या मोदींच्या फक्त थापाच थापा आहेत”, अशी टीका यातून करण्यात आली.

हा नवाच सनातन धर्म निर्माण केला

“आज देशाचे चित्र काय आहे? मोदी शहांच्या माणसांबरोबर ‘भगोडा’ आरोपी ललित मोदी आरामात ‘चिअर्स’ करीत आहे. हा एक नवाच ‘सनातन धर्म’ भाजपने निर्माण केलेला दिसतोय. सगळेच चोर मोदी कसे?’ या एका विधानावर राहुल गांधी यांची खासदारकी मोदी सरकारने रद्द केली, त्यांचे घर काढून घेतले, त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्या ‘चोर मंडळा’तील एक मोदी लंडनच्या पार्टीत ‘चिअर्स’ करताना संपूर्ण देशाने पाहिला. त्या मोदीला प्रेमालिंगन देणारे कायदेपंडित भारताच्या ‘एक देश एक निवडणूक’ समितीत बसतील तेव्हा देशाच्या भावना नेमक्या कशा असतील?” असा मिश्कील प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

मोदी-साळवे संबंधांवर उत्तर द्यावे लागेल

“राहुल गांधी यांनी ‘सर्व मोदी चोर कसे?’ हे विधान करताच साळवे दुःखी झाले. राहुल गांधी यांचे विधान असंसदीय असल्याचे सांगून साळवे यांनी मोदींची (पंतप्रधान) बाजू घेतली त्यामागचे इंगित आता उघड झाले. पंतप्रधान मोदी यांनी जो नवा अमृतकाल निर्माण केला त्या अमृतकालाचे विष करणारा हा प्रकार आहे. मोदी व शहा यांना आता ललित मोदी-साळवे संबंधांवर संसदेत उत्तर द्यावे लागेल व उत्तर देताना भंबेरी उडेल म्हणून सत्ताधारी अमृतकालातले विशेष अधिवेशनही गोंधळ घालून बंद पाडतील”, असा दावाही त्यांनी केला आहे.

लोकांना मुर्ख बनवण्याचा धंदा

“भाजप विरोधकांना खोट्या प्रकरणांत गोवणाऱ्या देशातील तपास यंत्रणा आता काय भूमिका घेणार? की ललित मोदीलाही स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे होणार? मोदी सरकारला पाकिस्तानातून दाऊदला आणता आलेले नाही आणि ‘भगोडा’ गुन्हेगार तसेच ज्याच्याबाबत ‘लुक आऊट’ नोटीस जारी झाली आहे तो ललित मोदी समोर दिसत आहे, तोही केंद्र सरकारच्या वकिलांबरोबर ‘चिअर्स’ करताना. लोकांना मूर्ख बनविण्याचा हा धंदा आहे. सगळे चोर एक आहेत व चोरांचे सरदार दिल्लीचे सरकार चालवीत आहेत. ललित मोदीस कुणाचे संरक्षण लाभले आहे, हे साळवेंच्या तिसऱ्या लग्नाने उघड केले. तिसऱ्या लग्नाची ही गोष्ट रंजक आहे. देशाचा व्हिलन त्या लग्नात दिसल्यामुळे भाजपची पुरती नाचक्की झाली, पण निर्लज्जम् सदासुखी! भाजपचा मुखवटा हा असा रोजच गळून पडतो आहे”, अशी टीकाही यामाध्यमातून करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One of the thieves mandal modi at london party the thackeray groups slogan said chief of thieves sgk